: लग्नाचा बार वाढतोय लोकांच्या हदयाचे ठोके– लॉकडाऊनची पायमल्ली
प्रवीण देसाई/कोल्हापूर
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने कडक लॉकडाऊन केला आहे. गर्दी होणार्या प्रत्येक गोष्टींवर कडक निर्बंध आणले आहेत. यामध्ये 25 लोकांच्या उपस्थितीत व दोन तासातच लग्न समारंभाला परवानगी दिली आहे. परंतु याची पायमल्ली करत 300 हून अधिक जण या समारंभाला उपस्थित राहून लग्नाचे बार उडवत असल्याचे चित्र आहे. नुकतेच मडिलगे (ता. आजरा) येथील लग्न समारंभात 30 हून अधिक जण कोरोनाबाधित झाल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाची साखळी तुटेपर्यंत लग्न समारंभांनाच बंदी घालावी, अशी मागणी होत आहे.
कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने प्रामुख्याने गर्दी होणार्या घटकांवर निर्बंध आणले आहेत. यामध्ये लग्न समारंभाला पूर्वी 50 जणांच्या उपस्थितीला परवानगी होती, परंतु आता ती कमी करुन 25 जणांवर आणली आहे. तसेच वेळेची मर्यादी फक्त दोन तासांची दिली आहे. परंतु लग्न समारंभात सरकारच्या नियमांची खुलेआम पायमल्ली होत असल्याचे दिसत आहे. परवानगी 25 ची आणि उपस्थिती 300हून अधिक असे चिंताग्रस्त चित्र अनेक लग्न समारंभात दिसत आहे. यामुळे कोरोनाचा संसर्ग कमी होण्याऐवजी वाढण्याचीच भिती निर्माण झाली आहे. यामध्ये प्रशासकिय यंत्रणाही कमी पडत असल्याचे दिसत आहे. लग्नाची परवानगी दिल्यावर त्या ठिकाणी जाऊन भेट देऊन उपस्थितांच्या संख्येची खात्री करण्याची गरज आहे. परंतु तशा पध्दतीने प्रशासकिय यंत्रणेकडून कार्यवाही होताना दिसत नाही. त्याचाच गैरफायदा घेऊन लग्न समारंभाचा बार 300च्या पुढे उपस्थितीने वाजत गाजत उडत आहे. इतक्या मोठÎा प्रमाणात लोक उपस्थित राहील्याने कोरोना संसर्ग मोठÎा प्रमाणात पसरण्याची शक्यता दाट आहे. नुकतेच मडिलगे (ता. आजरा) येथे एका लग्न समारंभात 30 हून अधिक जणांना कोरोनाची बाधा झाल्याने खळबळ उडाली. हे एक प्रातिनिधीक उदाहरण आहे. याकडे प्रशासकिय यंत्रणेने गांभिर्याने लक्ष देऊन संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.
जिल्हा प्रशासनाने लग्न समारंभांना परवानगी देऊ नये
जिह्यातील दिवसेंदिवस वाढणारी कोरोनाची रुग्णसंख्या व मृत्युदर भितीदायक आहे. त्यातच मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत लग्न समारंभांना परवानगी असताना मोठी गर्दी होत आहे. यामुळे संसर्गाची दाट शक्यता आहे. लग्न समारंभांमुळे कोरोनाबाधित झाल्याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत. त्यामुळे कोरोना नियंत्रणात येत नाही तोपर्यंत जिल्हा प्रशासनाने लग्न समारंभांना परवानगीच देऊ नये अशी मागणी होत आहे.