तहसीलदार कार्यालयातून केवळ 500 लोकांनाच परवानगी मिळणार
प्रतिनिधी /बेळगाव
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू वाढत आहे. त्याबरोबरच ओमिक्रॉनचीदेखील लागण होत आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून शाळांतील सभा, समारंभावर बंदी घालण्यात आली आहे. त्याचबरोबर विवाह समारंभांमध्येही केवळ 500 लोकांनाच परवानगी दिली जाणार आहे. याबाबत शासनाने नवीन मार्गसूची जारी केली आहे. त्यामुळे आता लग्नकार्यासाठी पुन्हा परवानगी घेणे आवश्यक आहे. मागील काही दिवसांपासून धार्मिक कार्यक्रम, लग्न सोहळे, जत्रा-यात्रा याकरिता परवानगी घेण्याकडे नागरिकांनी पाठ फिरविली होती. मात्र आता पुन्हा लग्न समारंभासाठी परवानगी बंधनकारक बनली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यापासून धार्मिक कार्ये आणि लग्न सोहळय़ांवर मर्यादा आल्या आहेत. नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी लग्नकार्याला 500 वऱहाडींनाच परवानगी दिली जात आहे. मात्र काही वधू आणि वराकडील मंडळी परवानगी न घेताच लग्नकार्य उरकत आहेत. मात्र लग्नकार्यासाठी परवानगी घेणे आवश्यक आहे, अशी माहितीही तहसीलदार कार्यालयातून उपलब्ध झाली आहे.
परवानगी मिळविण्यासाठी संबंधितांना लग्न समारंभ किंवा कार्यक्रमाची तारीख, स्थळ, पत्ता अर्जात नमूद करावा लागणार आहे. मागील काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी झाल्याने नागरिकांनी परवानगी घेण्याकडे दुर्लक्ष केले होते. मात्र आता पुन्हा कोरोना वाढत असल्याने शासनाने नवीन मार्गसूची जारी केली आहे. त्याबरोबरच लग्नकार्य व इतर कार्यक्रमांसाठी परवानगी आवश्यक आहे.
शासनाच्या नवीन नियमानुसार परवानगी
शासनाच्या नवीन नियमानुसार लग्नकार्यासाठी परवानगी दिली जात आहे. मात्र नागरिकांनी परवानगी घेण्याकडे दुर्लक्ष केले आहे. दिवसाला केवळ एक किंवा दोन जण परवानगी घेत आहेत. मात्र नियमानुसार परवानगी घेणे आवश्यक आहे.
– व्ही. मोहन (तहसीलदार ग्रेड टू)