ओनलाईन टीम/तरुण भारत
राजस्थानमध्ये नवरदेवाची कार चंबळ नदीमध्ये कोसळून झालेल्या अपघातामध्ये 9 जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच उत्तराखंडमधील चंपावत येथे सोमवारी रात्री लग्न संपवून परतणाऱ्या गाडीला भीषण अपघात झाला. टनकपूर-चंपावत महामार्गाला जोडलेल्या सुखीडांग-डांडामीनार रस्त्यावर रात्री लग्न संपवून परतणारं एक वाहन दरीत कोसळलं. या अपघातात १४ वऱ्हाडींचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच, पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचलं. दरम्यान, खड्ड्यातून १४ मृतदेह बाहेर काढण्यात आले असून अपघातात गंभीर जखमी झालेल्या दोघांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. मिळालेल्या माहितीनुसार, वाहनात 16 जण होते. त्यापैकी 14 जणांचा मृत्यू झालाय.
मिळालेल्या माहितीनुसार, मॅक्स गाडी नंबर यूके ०४, टीए- ४७१२ मध्ये प्रवास करणारे सर्व लोक टनकपूरच्या पंचमुखी धर्मशाळामधील लग्न सोहळा आटपून घरी परतत होते. पण मध्यरात्री ३ वाजून २० मिनिटांच्या आसपास गाडीवरचे नियंत्रण सूटले आणि गाडी थेट खोल दरीत जाऊन कोसळली. गाडीतील सर्व प्रवासी ककनई रहिवाशी लक्ष्मण सिंह यांचा मुलगा मनोज सिंहच्या लग्नाला गेले होते. या दुर्घटनेमधील काही मृत व्यक्ती लक्ष्मण सिंह यांचे सख्खे नातेवाईक आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आहे.
गाडीतील सर्व प्रवासी हे टनकपूर येथील पंचमुखी धरमशाळा येथे लग्नासाठी गेले होते. लग्न सोहळा आटोपून ते आपल्या घराकडे निघाले होते. दरम्यान रात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. रात्री जवळपास तीन वाजता ही दुर्घटना घडली. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.