आठ ते दहाजणांचा कोरोनाने बळी गेल्याची चर्चा : चार गावे संशयाच्या भोवऱयात
- नाटळ, हरकुळ-बुद्रुक, मातोंड, पाल ही गावे संशयाच्या भोवऱयात
- माणसं जमवून विवाहाचे आयोजन करण्याचा अट्टाहास आला अंगाशी
- जाहीर विवाहामुळे काही वाडय़ांना झाली कोरोनाची बाधा
- सरसकट सर्वच विवाहांवर काही काळापुरती बंदी घालण्याची मागणी
शेखर सामंत / सिंधुदुर्ग:
कोरोनाच्या महामारीत सिंधुदुर्गात प्रचंड धोकादायक स्थिती झाली असतानाही जाहीर लग्न समारंभाचा अट्टाहास धरून लग्नविधी पार पाडलेल्या काही वऱहाडींना कोरोनाची लागण होऊन सुमारे आठ ते दहाजणांचा हकनाक बळी गेल्याची खळबळजनक बाब उघडकीस आली आहे. नाटळ, हरकुळ-बुद्रुक, मातोंड, अणसूर-पाल या गावांमध्ये अशा प्रकारच्या घटना घडल्याची विश्वसनीय माहिती पुढे येत आहे.
दरम्यान, लग्नकार्याच्या माध्यमातून कोरोनाचा प्रसार होऊन हकनाक बळी जात असतानाही अजूनही जाहीर लग्न समारंभाचा अट्टाहास धरून संपूर्ण गावाला धोक्यात आणणारे महाभाग अनेक गावागावांमध्ये दिसून येत आहेत. या संपूर्ण गावाला धोक्यात आणणाऱया या जाहीर लग्न समारंभांवर किमान तीन महिन्यांची बंदी घालावी, अशी मागणी या बेफिकीरीच्या पार्श्वभूमीवर जोर धरू लागली आहे.
अशा समारंभात सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नाही. त्याचप्रमाणे कोरोनाची लक्षणे असून देखील तपासण्या केल्या जात नाहीत. म्हणून जाहीर समारंभाला जिल्हय़ात बंदी घालण्यात आली आहे. एखाद्या लग्नविधीसाठी 25 ते 40 माणसांची अट आहे. मात्र ग्रामीण भागात होणाऱया अनेक लग्न समारंभांना बिनधास्त गर्दी केली जात असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे. अशा लग्न समारंभांमध्ये बाहेरील जिल्हय़ातून येणारी मंडळी कोणत्याही तपासण्या न करता, त्याचप्रमाणे ज्यांच्या घरामध्ये कोविड पॉझिटिव्ह रुग्णाला होम क्वारंटाईन करण्यात आलेले आहेत, अशा घरातील मंडळीदेखील या लग्न समारंभांमध्ये खुलेआम वावरताना दिसत आहेत. वरील गावांबरोबरच जिल्हय़ातील अशाच काही गावांमध्ये प्रशासनाची नजर चुकवून पार पडलेल्या लग्न समारंभात कोरोनाची लागण होऊन त्यातून कोरोनाचा गावभर प्रसार झाल्याचे व त्यातून काहीजणांचे बळी गेल्याचे विश्वसनीय बातमी हाती आली आहे. काही लग्न समारंभात तर कोरोनाचा एवढा प्रसार झाला की, त्यामध्ये मुलीच्या माहेरचे पूर्ण कुटुंबच पॉझिटिव्ह होऊन अडचणीत आल्याची माहिती हाती आली आहे.
जिल्हय़ात अशा प्रकारची आणीबाणीची स्थिती असतानाही अनेक सुशिक्षित मंडळी जाहीर लग्न समारंभाचा अट्टाहास धरून नातेवाईकांना, सग्यासोयऱयांना, मित्रमंडळींना जाणीवपूर्वक अडचणीत आणत असल्याची बाब हाती आली आहे. आपल्या नको त्या अट्टाहासापाई संपूर्ण गावाला, मित्रमंडळींना, सग्यासोयऱयांना धोक्यात घालणाऱया अशा मंडळींवर आता कडक कायदेशीर कारवाई होणे गरजेचे आहे. केवळ याच मंडळींवर नव्हे, तर ज्या ठिकाणी अशा प्रकारचे लग्न समारंभ आयोजित केले जात आहेत, त्या मंगल कार्यालयांचे मालक किंवा चालक, दोन्ही बाजूची वऱहाडी मंडळी यांच्यावरही फौजदारी गुन्हे दाखल करावे व सदर मंगल कार्यालयावर टाळे ठोकण्याची कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.