ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
अडचणीत असलेल्या लघु आणि कुटीर उद्योगांसाठी 20 हजार कोटींचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. देशातील 20 लाख लघु, मध्यम उद्योगांना याचा फायदा होईल, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन त्यांनी सांगितले.
कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या सर्व प्रकारच्या उद्योगांना चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल 20 लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले. या पॅकेजमधील काही तरतुदींची सीतारामन यांनी आज माहिती दिली.
सीतारामन म्हणाल्या, भारताला आत्मनिर्भर बनवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आर्थिक पॅकेजची घोषणा केली आहे. या पॅकेजच्या आधारे देशातील लोकल ब्रॅन्डसला ग्लोबल बनविण्याचे लक्ष्य आहे. तसेच लॅन्ड, लेबर, लिक्विडीटीवर भर देण्यात येणार आहे. 15 पैंकी 6 योजना लघु आणि कुटीर उद्योगांसाठी जाहीर करण्यात आल्या आहेत. या योजनेअंतर्गत अडचणीतल्या लघु-कुटीर उद्योगासाठी 20 हजार कोटींचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. 20 लाख लघु, मध्यम उद्योगांना याचा फायदा होईल. लघु आणि कुटीर उद्योगांना कोणत्याही गॅरंटीशिवाय 3 लाख कोटींच्या कर्जाचे पॅकेज देण्यात येत आहे. 45 लाख लघु उद्योगांना 31 ऑक्टोबरपासून याचा फायदा होईल. 100 कोटींपर्यंतच्या उद्योगांना कर्जमध्ये दिलासा मिळणार आहे. तसेच प्रगती करणाऱ्या लघु, मध्यम उद्योगांसाठी 10 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
नॉन बँकिंग वित्तीय संस्थांसाठी 30 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तसेच 15 हजारांपर्यंत उत्पन्न असलेल्या कामगारांचा जून ते ऑगस्ट दरम्यानचा पीएफ सरकार भरणार आहे.12 टक्क्यांऐवजी 10 टक्केच पीएफ कापला जाईल. त्यासाठी 2500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
*200 कोटींपर्यंतचे सरकारी टेंडर स्थानिक पातळीवर भरता येणार आहे.
*बांधकाम क्षेत्रातील ठेकेदारांना 6 महिन्यांची मुदतवाढ *वीज वितरण कंपन्यांसाठी 90 हजार कोटींची मदत
*मार्च 2021 पर्यंत टीडीएड च्या दरात 25 टक्क्यांची कपात
*आयकर विवरण भरण्याची मुदत 30 नोव्हेंबरपर्यंत