संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची उपस्थिती -लष्करी अधिकारी-जवानांशी साधला संवाद
लडाख / वृत्तसंस्था
लडाख दौऱयावर असलेल्या संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते काही योजना, प्रकल्पांचे लोकार्पण नुकतेच करण्यात आले. याप्रसंगी लडाख येथील पायाभूत सुविधांमध्ये मोठे तसेच ठोस बदल करण्यासाठी सकारात्मक पावले उचलली जात असल्याचे सिंह यांनी सांगितले. तसेच कारु मिलिस्ट्री स्टेशन येथे जाऊन जवानांना प्रोत्साहन दिले. याचदरम्यान संरक्षणमंत्र्यांनी सैन्याधिकारी आणि जवानांशी मनमोकळा संवाद साधला. भारताची संरक्षण यंत्रणा मजबूत असल्यामुळे कोणीही भारताकडे वाकडय़ा नजरेने पाहू शकत नाही. भारताने कधीही कुणावरही प्रथम वार केला नाही, असे प्रतिपादन राजनाथ सिंह यांनी यावेळी बोलताना केले.
लडाख दौऱयादरम्यान संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी एक ट्विट करत जम्मू-काश्मीर आणि लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभागणी करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयामुळे राष्ट्रीय सुरक्षिततेला मोठा हातभार लागल्याचे म्हटले आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे येथील दहशतवादी कारवाया कमी झाल्या आहेत. तसेच दोन्ही प्रदेशांमधील नागरिकांसाठी सामाजिक आणि आर्थिकदृष्टय़ा विकास करण्याच्या अनेक संधी विभागणीनंतर खुल्या झाल्या आहेत, असे राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.
सैनिक संख्येत वाढ
गेल्या वर्षापासून लडाख सीमेजवळील सुरु असलेल्या चीनच्या कारवायांना प्रत्युत्तर देण्यासाठी आक्रमक पवित्रा घेत भारताने सुमारे 50 हजार अतिरिक्त सैनिक सीमेवर तैनात केल्याची माहिती मिळाली आहे. चीनच्या सीमेवर लक्ष ठेवण्यासाठी आता सुमारे 2 लाख सैनिक तैनात करण्यात आले आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत ही संख्या 40 टक्के अधिक असल्याचे सांगितले जात आहे.