लेफ्टनंट जनरल जोशी यांचे विधान : चीनसोबतचे युद्ध टाळले
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सुमारे वर्षभरापासून सुरू असलेल्या तणावादरम्यान चिनी सैन्य आता माघार घेत आहे. चीनच्या माघारीला भारताचा मोठा धोरणात्मक विजय मानले जात आहे. याचदरम्यान भारतीय सैन्याच्या नॉदर्न आर्मी कमांडर लेफ्टनंट जनरल वाय.के. जोशी यांनी या मुद्दय़ावर प्रतिक्रिया दिली आहे. भारताने चीनसोबतचे युद्ध टाळले आहे. दोन्ही देश युद्धाच्या उंबरठय़ावर होते असे जोशी यांनी म्हटले आहे.
पूर्व लडाखमध्ये चीनसोबत सुमारे 9 महिन्यांपासून सुरू असलेल्या तणावादरम्यान अनेक उतार-चढाव आले आहेत. पण भारत-चीन मागील वर्षी 31 ऑगस्ट रोजी युद्धासमीप आले होते. भारताने कैलास रेंजच्या शिखरांवर 29 आणि 30 ऑगस्ट रोजी नियंत्रण मिळविले हेते. ही कारवाई सामरिकदृष्टय़ा बळ वाढविणीर होती. भारताने अचानक उचललेल्या या पावलामुळे चीन त्रस्त झाला होता. चिनी सैन्याने यासाठी भारताच्या विरोधात मोहीम सुरू केली होती असे सैन्याधिकाऱयाने म्हटले आहे.
गलवानमधील घटना घडून गेली होती. तर भारतीय सैन्याला मोहिमात्मक स्वातंत्र्य होते. चीनचे सैन्य वर येण्याचा प्रयत्न करत असताना त्यांच्यावर गोळीबार करणे सर्वात सोपे होते आणि यासाठी कुठल्याही साहसाची गरज नसते. पण अशा स्थितीत गोळीबार न करणे, ट्रिगर न खेचणे साहसाचे असते. युद्ध खरोखरच टाळले गेले होते. आम्ही युद्धाच्या उंबरठय़ावर होतो असे जोशी यांनी म्हटले आहे. गलवानमध्ये चीनचे सुमारे 45 सैनिक मारले गेल्याची माहिती रशियाच्या वृत्तसंस्थेने दिली आहे.