लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सुरू असणारा भारत-चीन संघर्ष गेल्या एप्रिलपासून गाजत आहे. यासंबंधात देशात अनेक आरोप-प्रत्यारोप होत आहेत. काही दिवसांपूर्वी दोन्ही देशांमध्ये झालेल्या चर्चेनुसार पँगाँग सरोवराच्या परिसरात एकमेकांच्या डोळय़ाला डोळा भिडवून उभे असलेले सैनिक दोन्ही देशांनी मागे घेण्यास प्रारंभ केला आहे. या भागातील ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर गोग्रा आणि देपसांग भागांमधील सैन्य माघारीसंबंधी चर्चा केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. थोडक्यात, शिगेला पोहचलेला तणाव निवळण्याच्या दिशेने काही पावले पडताना दिसतात. पण भारतात प्रत्येक मुद्दय़ाचे राजकारण केले जाते, तसे याचेही होत आहे. विरोधी पक्षांच्या, तसेच त्यांचे समर्थन करणाऱया तथाकथित विचारवंतांच्या म्हणण्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने भारताची 1,300 चौरस किलोमीटरची भूमी चीनच्या घशात जाऊ दिली. काँगेसचे नेते राहुल गांधी यांनी तर नुकताच एका पत्रकार परिषदेत असा आरोप केला की, पंतप्रधान मोदी भेकड असून त्यांनी चीनचा प्रतिकार केला नाही. त्यांचे असेही म्हणणे आहे की पँगाँग परिसरात भारताची सीमारेषा फिंगर 4 पर्यंत आहे. पण सरकारने फिंगर 3 पर्यंत माघार घेऊन फिंगर 4 ते फिंगर 3 यामधली भूमी चीनला बळकावू दिली. याउलट चीनला एक इंचही भूमी घेऊ दिलेली नाही असे प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथसिंग यांनी केले आहे. पंतप्रधान मोदींनीही हेच प्रतिपादन काही महिन्यांपूर्वी केले होते. म्हणजेच या संदर्भात सरकार आणि विरोधक यांच्यात एकवाक्यता नाही. त्यामुळे या स्थितीचे विश्लेषण करणे आवश्यक आहे. प्रथम विरोधकांचे आरोप विचारार्थ घेऊ. त्यांच्या आरोपानुसार भारताने चीनला आपली भूमी घेऊ दिली. यावर प्रश्न असा की भारताने विनासायास आणि प्रतिकार न करता चीनला भूमी घेऊ दिली असेल आता चीन मागे का जात आहे? भारताची भूमी बळकावणे हाच चीनचा उद्देश असेल तर आता नेमकी कोणती परिस्थिती उद्भवली की जेणेकरून त्याला मागे जावे लागत आहे? याचे उत्तर देण्याची जबाबदारी विरोधकांवर पडते, कारण त्यांनीच भूमी बळकावू दिल्याचा आरोप केला होता. दुसरा प्रश्न असा की, भारत आणि चीन यांच्यातील नेमकी सीमारेषा कोणती? ती निश्चित केली गेली आहे काय? या प्रश्नाचे उत्तर अशी सीमा निर्धारित केली गेलेली नाही हेच आहे. मग कुणी, कुठे, केव्हा आणि किती प्रमाणात घुसखोरी केली हे निश्चितपणे कसे सांगता येऊ शकते? हा प्रश्न विचारायचे कारण असे की आपण संपूर्ण लडाख भारताच्या नकाशात भारताच्या स्वामित्वात दाखवितो. पण वस्तुस्थिती अशी की, भारताचे भाग्यविधाते मानले गेलेले जवाहरलाल नेहरू (राहुल गांधी यांचे पणजोबा) हे पंतप्रधान असताना लडाखच्या साधारण 76 हजार चौरस किलोमीटर भागातील 38 हजार चौरस किलोमीटर प्रदेश चीनने घशात घातला होता. यातूनच पुढे 1962 चे युद्ध उद्भवले आणि त्यातही भारताचा मानहानीकारक पराभव झाला. हा पराभव आपले सैनिक पराक्रमात कमी पडले म्हणून झाला नव्हता, तर त्यासाठी त्यावेळच्या सरकारचे राजकीय धोरण जबाबदार होते. ही 38 हजार चौरस किलोमीटर भूमी गमावणे ही जर धाडसी कृती असेल तर आज मोदींवर भेकडपणाचा आरोप करता येऊ शकणार नाही. कारण न्यायाचे निकष समान असावे लागतात. राहुल गांधी यांनी नुकतेच असेही म्हटले आहे की, पँगाँग सरोवर परिसरातील सैन्यमाघारीचा जो ठराव नुकताच झाला त्यात भारताने आपली सेना फिंगर 3 पर्यंत मागे आणली. वास्तविक आपली सीमा फिंगर 4 पर्यंत आहे. म्हणजेच राहुल गांधी यांना असे सुचवायचे आहे की मोदींनी फिंगर 3 ते फिंगर 4 यामधील भूमी गमावली. तथापि, भारताच्या संरक्षण विभागाने यावर असे स्पष्टीकरण दिले आहे की संपूर्ण लडाखच भारताचा असून त्याच्या बव्हंशी भागावर चीनने बेकायदेशीर कब्जा केला आहे. अगदी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा गृहित धरली तरी भारताची प्रत्यक्ष नियंत्रण रेषा फिंगर 8 पर्यंत आहे. आता चीन फिंगर 8 च्या पलीकडे आपली सेना माघारी घेत आहे. म्हणजेच एप्रिल 2020 च्या पूर्वी जशी स्थिती होती, तशी निदान पँगाँग भागात तरी निर्माण होत आहे. हे आपल्या संरक्षण विभागाचे स्पष्टीकरण असताना, राहुल गांधी फिंगर 4 पर्यंत भारताची सीमा आहे असे सांगतात ते कोणत्या आधारावर? असे विधान करून राहुल गांधींनी फिंगर 4 ते फिंगर 8 मधील भूमी चीनला देऊन टाकली असे समजायचे काय? फिंगर 3 ते फिंगर 4 यामधील भूमी चीनला बळकावू दिल्याने पंतप्रधान मोदी हे भेकड ठरत असतील तर फिंगर 4 पर्यंत भारताची भूमी आहे, असे सांगून फिंगर 4 ते 8 मधील भूमी चीनला देणारे राहुल गांधी कोण ठरतात, असाही रास्त प्रश्न जनतेच्या मनात आहे. असो. हे सर्व आरोप-प्रत्यारोप पाहता सर्वसामान्य माणसासमोर तीन परस्परविरोधी स्थिती उभ्या राहतात. त्या अशा की, एक, भारताच्या 60 वर्षांपासूनच्या म्हणण्यानुसार आणि नकाशानुसार संपूर्ण लडाख भारताचा आहे, पण त्याच्या पुष्कळशा भागावर चीनचा बेकायदेशीर कब्जा आहे. दोन, पँगाँगचा विचार करता भारताची प्रत्यक्ष नियंत्रण रेषा फिंगर 8 पर्यंत आहे. तीन, राहुल गांधी यांच्या म्हणण्यानुसार ती फिंगर 4 पर्यंत आहे. या साऱया जंजाळातून लडाख नेमके कुणाचे हा प्रश्न उभा राहतो. याचे उत्तर सरकार आणि या सरकारपूर्वी सत्तेवर असणारा विरोधी पक्ष यांनी दिले पाहिजे. यापैकी पंतप्रधान मोदी यांच्या सरकारने संपूर्ण लडाख भारताचेच आहे हे निःसंदिग्धपणे सांगून आपली बाजू स्पष्ट केली आहे. आता जे नेते फिंगर 4 पर्यंत भारताची भूमी आहे असे सांगतात, त्यांनी बाकीच्या लडाखचे काय, याचे उत्तर देण्याची आवश्यकता आहे. हा प्रश्न राजकीय स्वार्थाचा नसून भारताच्या सार्वभौमत्वाचा आणि सुरक्षेचा आहे. त्यामुळे कोण भेकड किंवा धाडसी, अशी विधाने करण्यापेक्षा सर्व भारतीयांनी एका सुरात आजवर सातत्याने मांडलेली भारताची अधिकृत आणि वैध बाजू निर्धाराने धरून राहण्याची आवश्यकता आहे. अन्यथा, लाभ शत्रूचा होईल, ही बाब जे सुज्ञ आहेत त्यांनी तरी समजून घ्यावी.
Previous Articleसैतवडेत शॉर्टसर्किटमुळे घराला आग, लाखोंचे नुकसान
Next Article हल्ल्यांमुळे न्यूयॉर्कमध्ये दहशत, सुरक्षेत वाढ
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.