ऑनलाईन टीम / लडाख :
पूर्व लडाखमधील पँगाँग तलाव परिसरात 29 आणि 30 ऑगस्टच्या मध्यरात्री चिनी सैनिकांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोन्ही देशाच्या सैन्यात झटापट झाली. मात्र, भारतीय जवानांनी चिनी सैन्याला रोखून घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावला.
पूर्व लडाखमधील भारत आणि चीनच्या सीमारेषेवरून निर्माण झालेला तणाव निवळण्यासाठी दोन्ही देशांच्या वरिष्ठ लष्करी पातळीवर चार ते पाच बैठका झाल्या. त्यामध्ये दोन्ही देशांनी सीमारेषेवरील सैन्य मागे घेण्याचे मान्य केले होते. त्यानंतर चीनने काही भागातील सैन्य आणि शस्त्रसाठा मागे घेतला होता. मात्र, चीनच्या कुरापती काही थांबण्याचे नाव घेत नाहीत. चिनी सैन्याने पुन्हा एकदा भारतीय सीमेत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत भारतीय सैन्याशी झटापट केली.
त्यामुळे भारताने पँगाँग तलाव परिसरात सैन्यबळ वाढवले आहे. या झटापटीवर चुशूलमध्ये ब्रिगेड कमांडर दर्जाच्या अधिकाऱ्यांची बैठक सुरू आहे.