‘एलएसी’जवळ तंबूंची उभारणी- 8 ठिकाणी लष्करी छावण्या
लडाख / वृत्तसंस्था
छुप्या कारवाया करत भारतीय हद्दीत कब्जा करण्याचा प्रयत्न चीनने पुन्हा सुरु केले आहेत. सीमारेषेजवळ छावण्या उभारण्याची आगळीक चीनी सैन्यानेसुरु केली असून गुप्तचर अहवालानुसार, चीनने पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ (एलएसी) जवळपास 8 ठिकाणी नवीन मॉडय़ूलर कंटेनरची (तात्पुरते तंबू) व्यवस्था केली आहे. या तंबूंमध्ये सैनिकांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली असून तेथे लष्कराचा वावरही सुरू असल्याचे समजते. दरम्यान, गेल्या वर्षी लडाखमधील गलाव घाटीमध्ये चिनी सैन्याला जोरदार झटका दिल्यानंतर गेले सुमारे दीड वर्ष सीमावर्ती भागामध्ये शांतता होती. परंतु चिनी सैन्याने पुन्हा त्यांच्या स्वभावाला अनुसरुन आगळीकी सुरु केल्या आहेत.
पीपल्स लिबरेशन आर्मीने उत्तरेकडील काराकोरम खिंडीजवळ वहाब जिल्गा ते पियू, हॉट स्पिंग्स, चांग ला, ताशीगोंग, मांजा आणि चुरूपपर्यंत सैनिकांसाठी तंबू उभारले आहेत. प्रत्येक ठिकाणी सात क्लस्टरमध्ये 80 ते 84 तंबू बनवले गेले आहेत. गेल्या वषी एप्रिल-मे मध्ये भारत आणि चीन यांच्यात झालेल्या लष्करी चकमकीनंतर चीनने अनेक छावण्या उभारल्या आहेत. जुन्या छावण्यांव्यतिरिक्त येथे नवीन छावण्या साकारण्यात आल्याचे दिसते. पुन्हा झालेल्या या कुरापतींवरून आपले सैन्य मागे घेण्याचा चीनचा कोणताही हेतू नसल्याचे स्पष्ट होत आहे. एकीकडे लष्करी पातळीवर चर्चेच्या फेऱया चालू ठेवतानाच दुसरीकडे चीनने सीमावर्ती भागामध्ये सैनिकांचा जागता पहारा कायम ठेवल्याने भारताची चिंता वाढली आहे.
गलवान संघर्षानंतर चीन होता शांत
गेल्या वर्षी 15 जून रोजी गलवान खोऱयामध्ये जोरदार संघर्ष झाला होता. त्यानंतर भारताने या भागात संपूर्ण दक्षता बाळगून मोठय़ा प्रमाणात सैन्य व शस्त्रसाठा तैनात केला होता. त्याचबरोबर राफेल विमानांच्या दोन तुकडय़ाही सीमावर्ती भागामध्ये तैनात करण्यात आल्याने भारताची सैन्यशक्ती तुलबळ ठरली होती. मात्र आता पुन्हा चीनने अधिक सैन्यशक्ती गोळा करत सीमेवर तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.
दोन्ही बाजूंनी मोठी सैन्यशक्ती तैनात
भारत आणि चीन या दोन्ही देशांनी 50-50 हजार सैनिकांना पूर्व लडाखजवळ सीमा रेषेवर तैनात केले आहे. त्यांच्याकडे हॉवित्झर, टँक आणि पृ÷भागावरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रप्रणाली आहे. सीमेवरील या बदलत्या स्थितीमुळे दोन्ही बाजूंचे सैन्य ठराविक कालावधीने बदलले जात आहे. लडाखपासून अरुणाचल प्रदेशपर्यंत विस्तारलेल्या या प्रदेशात चीनने अनेक हवाई पट्टय़ा आणि नवीन हेलिपॅड देखील बांधले आहेत. चीनने आपले होतन, काशगर, गारगुन्सा, ल्हासा-गोंगगर आणि शिगत्स हे प्रमुख हवाई तळ अपग्रेड केले आहेत.