लष्कर-हवाई दलाची संयुक्त मोहीम : ‘एलएसी’वर भारताने दाखवले सामर्थ्य
नवी दिल्ली, लेह / वृत्तसंस्था
लडाखमधील सीमावादामुळे भारत-चीन तणाव निर्माण झाला असताना लष्कर आणि हवाई दलाने शुक्रवारी संयुक्त युद्धाभ्यास केला. या सरावात सुखोई लढाऊ विमान आणि चिनूक हेलिकॉप्टर सहभागी झाली होती. चीनच्या आक्रमक पवित्र्याला सडेतोड प्रत्युत्तर देण्यासाठी हा युद्धाभ्यास केल्याचा दावा केला जात आहे. युद्धाभ्यासाचा उद्देश दोन्ही सैन्यातील ताळमेळ वाढवणे हा होता. लडाख सीमेवर 11,000 ते 16,000 फूट उंचीवर हा संयुक्त सराव करण्यात आला.
एलएसीवर चीनसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्य आणि हवाई दलाचा युद्ध अभ्यास महत्त्वाचा मानला जात आहे. सैन्याचा हा अभ्यास निरंतर सुरू राहणार असल्याचे सांगितले जात आहे. या युद्धाभ्यासात फायटर आणि ट्रान्सपोर्ट विमाने सहभागी झाली होती. याचा एक व्हिडीओही समोर आला आहे. चीनला आव्हान देण्याच्या परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारी म्हणून हा सराव केला जात आहे. अलीकडेच चिनी सैन्याच्या युद्धाभ्यासाचा व्हिडीओही समोर आला होता. चीनने सोशल मीडियावर या युद्धाभ्यासाची छायाचित्रे प्रसारित केली होती.
चीनसोबतच्या वाढत्या तणावामुळे एलएसीवर सैन्यबळ कमी करता येणार नाही. अद्यापही गलवान खोरे, पँगोंग सरोवर आणि दौलत बेग ओल्डी भागात चिनी सैन्य तैनात आहे. त्यामुळेच लडाखच्या लेह भागात भारतीय सैन्य आणि हवाई दलात मोठा युद्धसराव घेण्यात आला. यात भारतीय सैन्याचे सुखोई-30, एमकेआय अत्याधुनिक लढाऊ विमानांनी भाग घेतला. तसेच युद्धासाठी आवश्यक साहित्य आणि जवानांना वेगाने एका जागेवरून दुसऱया ठिकाणी घेऊन जाणारी हर्क्युलस आणि वेगवेगळी मालवाहन विमानेही सहभागी झाली होती.
लष्करप्रमुखांनी दिली संरक्षणमंत्र्यांना माहिती
लष्करप्रमुख जनरल नरवणे यांनी नुकताच लेह-लडाखचा दौरा केला असून त्यांनी सीमेवर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली आहे. तसेच सैनिकांचे मनोबल वाढविण्याचा प्रयत्नही त्यांनी केला. तेथील सद्यस्थितीबाबत नरवणे यांनी शुक्रवारी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्याशी संवाद साधत सर्व माहिती दिली. लडाख भागात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर असलेला फौजफाटा, तेथील वातावरण, चीनचे सैन्यबळ आदी विषयांवर चर्चा झाल्याचे समजते.
अमेरिका वाढवणार आशियातील सैन्यबळ
चीनची वाढती अरेरावी पाहून अमेरिकेने कठोर भूमिका घेत आशिया खंडातील सैन्यबळ वाढविण्याची तयारी दर्शवली आहे. जर्मनीमध्ये तैनात असलेल्या 9 हजार 500 सैनिकांना आशिया खंडाकडे वळवण्याचा निर्णय अमेरिकेने जाहीर केला आहे. अमेरिकन परराष्ट्रमंत्र्यांनी यासंबंधी स्पष्ट संकेत दिले असून युरोपियन महासंघात हा मुद्दा उपस्थित केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. या निर्णयामुळे अमेरिकेने अप्रत्यक्षपणे भारताला पाठिंबा देत चीनची दादागिरी रोखण्याचा प्रयत्न केलेला दिसतो.
सध्या भारत-चीन सीमेवर तणाव वाढत असल्याने अमेरिकाही आक्रमक झाली आहे. चीनच्या अरेरावीला आवर घालण्याचे प्रयत्न अमेरिकेकडून सुरू आहेत. चीनकडून भारताबरोबराच व्हिएतनाम, इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपाईन्स आणि दक्षिण चीन महासागरातही कुरापती सुरू आहेत. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने युरोपमधून आपले सैन्य काढून आशिया खंडात तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेने जर्मनीमधून आपले सैन्य माघारी बोलावण्याचा निर्णय घेतला आहे.