ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
पूर्व लडाखमध्ये चिनी सैन्य तसेच त्यांची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टरची हालचाल थांबण्यासाठी भारताने नियंत्रण रेषेजवळ हवाई संरक्षण क्षेपणास्त्र तैनात केले आहे.
पूर्व लडाख आणि सिक्कीममधील सीमावादावर झालेल्या दोन्ही देशांच्या बैठकीत सीमारेषेवरील सैन्य मागे घेण्यावर एकमत झाले होते. मात्र, तरी देखील चीनने पीपल्स लिबरेशन आर्मीचे 16 कॅम्प लडाख एलएसीच्या 9 किलोमीटर अंतरावर उभारले आहेत. तसेच पँगाँग टीएसओ भागात चीनने हेलिपॅडची उभारणी केली आहे.
धोकादायक चिनी सैन्याच्या कोणत्याही कृतीला योग्य उत्तर देण्यासाठी भारतानेही लडाख सीमेवर युद्धसज्जता ठेवली आहे.भारत-चीन सीमेवर चिनी सैन्याची हालचाल पाहता भारताने हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणालीसह इतर क्षेपणास्त्र यंत्रणा तैनात केल्या आहेत. या क्षेपणास्त्र यंत्रणा एलएसीमध्ये दौलत बेग ओलडी ते पूर्व लडाखच्या दक्षिणेकडील भागात तैनात करण्यात आल्या आहेत.
15 जूनला मध्यरात्री झालेल्या भारत-चीन हिंसक संघर्षानंतर चीनने सीमेवर आपले लढाऊ विमान तैनात केले आहेत. चीनने एसयू 30 आणि इतर लढाऊ विमानांची संख्या वाढवली आहे. LAC वर हवाई संरक्षण क्षेपणास्त्र यंत्रणा तैनात केल्यानंतर चीन यापुढे भारतीय हवाई क्षेत्राचे उल्लंघन करू शकणार नाही, असे सूत्रांचे म्हणणे आहे.