चंद्रकांत देवरुखकर/ सातारा
कोरोनाचा कहर वाढू लागला असताना काही रुग्ण बरे होवून घरीही जात आहेत ही बाब प्रचंड दिलासादायक आहे. मात्र, या रुग्णांची सेवा करणाऱया कोरोना वॉरियर्स डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्य कर्मचाऱयांची हेटाळणी सुरु असल्याच्या गोष्टी घडत आहेत. एकीकडे कोरोना विरुध्दच्या लढाईत जीवावर उदार होवून काम करत असलेल्या या डॉक्टर्स, पोलीस यांना कोरडी सहानुभुती दाखवण्यापेक्षा त्यांची राहण्याची व्यवस्था साताऱयातील तारांकित हॉटेल्स व लॉजमालकांनी करावी तसेच समाजाने व शासनाने या लढवय्यांची दोन वेळा जेवणाची सोय केल्यास त्यांना घरी जावे लागणार नाही. प्रवास करावा लागणार नाही व समाजाकडून नकळतपणे दाखवले जाणारे वेगळेपणही जाणवणार नाही.
कोरोना विरुध्दचा जंग सुरु झाल्यानंतर पहिल्या फळीत डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्य सेवकांची लढाई सुरु झाली तर कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी पोलीस दलाला 24 तास रस्त्यावरची लढाई सुरु करावी लागली व अद्याप ती सुरुच आहे. जिल्हय़ात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढल्याने आता लॉकडाऊनचे महत्व जनतेला कळू लागले आहे. मात्र, या रुग्णांवर उपचार करत असलेले डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्य कर्मचाऱयांना वेगळय़ाच अनुभवास सामोरे जावे लागत आहे. ही लढवय्यी मंडळी जेव्हा डय़ुटी संपल्यानंतर आपापल्या घरी जातात तेव्हा त्यांच्याही मनात प्रचंड घालमेलच असते. मात्र, डय़ुटी संपल्यावर आपल्या घरटय़ातच ही मंडळी जाणार नाही तर मग जाणार तरी कोठे ? मात्र आता त्यांच्या घरी जाण्यालाही शेजारी, पाजारी लोकांकडून वेगळय़ा नजरेने पाहिले जात आहे. त्यांना टाळले जात आहे. हा प्रकार म्हणजे एकीकडे कोरोना वॉरियर्स म्हणून सलाम करायचा आणि दुसरी त्यांच्यापासून संसर्ग होईल म्हणून त्यांना घरी येण्यास मज्जाव करायचा असा घातकी व बेजबाबदार वृत्तीचा वाटतो.
सातारा शहराचा विचार केला तर जिल्हा रुग्णालयात सुमारे 100 कर्मचारी थेट कोरोना वॉरियर्स म्हणून कार्यरत आहेत. यामध्ये डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्य सेवक, सेविका यांचा समावेश आहे. 14 दिवसांच्या कामानंतर त्यांचा स्वॅब टेस्टिंगसाठी पाठवला जातो व त्यांच्या जागा दुसरे कोरोना वॉरियर्स डॉक्टर, नर्सेस घेतात. प्रचंड तणावात असताना देखील ही मंडळी कोरोनाविरुध्द लढत असताना आता त्यांच्याकडेच संशयाच्या नजरेने पाहिले जात आहे याचे या वॉरियर्संना प्रचंड दुःख आहे. त्यांना खोटी सहानुभुती दाखवण्यापेक्षा किंवा खोटी सलामी देण्यापेक्षा जिल्हाभर विविध ठिकाणी कार्यरत असलेल्या डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्य कर्मचाऱयांसह गरज असेल तर पोलीस बांधवांसाठी साताऱयातील नामवंत हॉटेल्स, लॉकमालकांनी सामाजिक बांधिलकी म्हणून या लढाईच्या काळात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उबे राहून या लढाईत योगदान दिले पाहिजे.
चौकट
आरोग्य कर्मचारी पॉझिटिव्ह आल्याने वाढतेय भीती
सातारा व कराड येथे आरोग्य कर्मचारी पॉझिटिव्ह आल्यानंतर ते ज्या ज्या एरियात राहतात तिथे भीती वाढल्याने या लढवय्यांकडे तसेच त्यांच्या कुटुंबियांकडे समाजाच वेगळय़ा नजरेने पाहू लागलाय. शमाजाने असे दुटप्पी वागू नये. आता सर्वांनीच एकत्रितपणे कोरोनाविरुध्दचा लढा यशस्वी करायचा आहे. त्यासाठी मग जे खऱया अर्थाने हा लढा लढत आहेत त्यांना निदान आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देवून लवकरच जिल्हा कोरोनामुक्त करण्यासाठी सज्ज झाले पाहिजे. त्यासाठीच साताऱयातील तारांकित हॉटेल्स व लॉज व्यवसायिकांनी मनाचा मोठेपणा दाखवण्याची गरज आहे.