बलाढय़ रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्धसंघर्षाचा भडका उडाला असतानाच रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी अण्वस्त्र दलास सतर्क राहण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे जगावर अणुयुद्धाचे मळभ दाटल्याचे दिसून येते. तर दुसऱया बाजूला युक्रेनने बेलारुस सीमेवर चर्चेची तयारी दर्शविल्याने यातून दोन देशांमध्ये समेट घडण्याची अंधुकशी आशाही निर्माण झाल्याची पहायला मिळते. या दोन टोकाच्या अवस्थांमध्ये सगळय़ा जगाचे लक्ष वेधून कुणी घेतले असेल, तर युक्रेनचे अध्यक्ष व्लजिमिर झिल्येन्स्की यांच्या लढाऊ बाण्याने. कुणालाही न जुमानणाऱया पुतीन यांच्यासारख्या हुकूमशाहाविरोधातही ते ज्या पद्धतीने उभे आहेत, ते पाहता हा नेता नक्कीच वेगळा ठरतो. म्हणूनच पुतीन कितीही ताकदवान असले, तरी आजच्या तरुण पिढीच्या गळय़ातील ताईत हा लढवय्या नेताच ठरला आहे. अवघ्या 44 वर्षांच्या या तरुण नेत्याचा कॉमेडियन ते अध्यक्षपदापर्यंतचा प्रवास तसा स्वप्नवतच म्हणायला हवा. ‘सर्व्हंट्स ऑफ द पीपल’ या सीरिजमध्ये एका विनम्र इतिहास शिक्षकाची भूमिका त्यांनी केली होती. पुढे भ्रष्टाचाराच्या विरोधात त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होतो व ते थेट राष्ट्राध्यक्ष बनतात, असे त्यात दाखविण्यात आले होते. राजकारण्यांकडून युक्रेनी नागरिकांचा झालेला भ्रमनिरास ठळकपणे सांगणारी ही कथा प्रत्यक्षात येणे वा त्याकरिता 73 टक्के लोकांचा सर्वोच्चपदावर विराजमान होणाऱया या नेत्याला पाठिंबा मिळणे, यातूनच त्यांची उंची लक्षात येते. मुख्य म्हणजे झिल्येन्स्की यांनी ‘सर्व्हंट्स ऑफ द पीपल’ हेच नाव पक्षासाठी निश्चित करीत त्या माध्यमातूनच निवडणूक लढविली. पूर्व भागात शांतता प्रस्थापित करू, असे आश्वासन देत सतारुढ झालेला हा युक्रेनचा नेता ‘जनतेचा सेवक’ ही भूमिका इमानेइतबारे पार पाडत असल्याचे सद्यःस्थितीवरून म्हणता येईल. पूर्व युक्रेनमधील वाद संपुष्टात आणण्यासाठी त्यांनी आजवर प्रामाणिकपणे प्रयत्न केले आहेत. तडजोड, चर्चा, शस्त्रसंधी, कैद्यांची देवाणघेवाण, शांतता याद्वारे रशियाबरोबर सामंजस्याने कसा वाद मिटविता येईल, यावर त्यांचा कटाक्ष राहिला. परंतु, पुतीन यांच्या दमनतंत्रामुळे पूर्व भागात वाद वा लढाया सुरूच राहिल्या. त्यातूनच झिल्येन्स्की यांनी युरोपियन युनियन व नाटोच्या लष्करी आघाडीत समाविष्ट होण्याकरिता जोर लावला होता. किंबहुना, त्यामुळे संतप्त झालेल्या पुतीन यांनी थेट युद्धाचाच मार्ग अवलंबल्याचे पहायला मिळते. वास्तविक, पुतीन हे अत्यंत महत्त्वाकांक्षी नेते आहेत. रशियाला पूर्वीचा दरारा मिळवून देण्याचा त्यांचा मनसुबा लपून राहत नाही. अमेरिकेबरोबरच्या महासत्तेच्या लढाईत झालेली पीछेहाट, सोव्हिएत युनियनची शकले यानंतर जागतिक राजकारणातील या देशाचे स्थान काहीसे घसरले होते. ते पुन्हा मिळवून देण्याच्या इराद्याने पछाडलेल्या पुतीन यांनी एकेकाळी सोव्हिएत युनियनचाच भाग असलेल्या युक्रेनवर युद्ध लादत जगालाच वेठीस धरले आहे. पुतीन यांचा हा आक्रमक चेहरा व आवेश नि दुसऱया बाजूला झिल्येन्स्की यांचे करारी व संयमी व्यक्तिमत्त्व आज जगाला पहायला मिळत आहे. युक्रेनची राजधानी कीवला रशियन फौजांनी धडक मारल्यानंतर मी पळून जाणार नाही, असे ज्या पद्धतीने त्यांनी ठणकावून सांगितले, त्यातून त्यांच्यातील बाणेदारपणाचे दर्शन घडते. मागील वर्षी तालिबान्यांच्या आक्रमणानंतर अफगाणिस्तानच्या अध्यक्षांनी पलायन करण्याचा मार्ग स्वीकारला होता. इतिहासातील असे अनेक दाखले देता येतील. त्यात झिल्येन्स्की उठून दिसतात. रशियाचा शत्रू क्रमांक एक मी व क्रमांक दोन माझे कुटुंबीय आहेत, हे मला माहीत आहे. मला लक्ष्य करून त्यांना राजकीयदृष्टय़ा युक्रेनला उद्ध्वस्त करायचे आहे. मात्र, मी कुठेही पळून जाणार नाही, राजधानीतच थांबणार, असा निर्धार व्यक्त करीत युक्रेनचे आपण खरेखुरे नेतृत्व असल्याचेच जणू त्यांनी दाखवून दिले. मला आता फक्त शस्त्रे हवी आहेत, असे सांगत अमेरिकेचा प्रस्ताव नाकारणारे नि आम्ही रशियासमोर कदापि झुकणार नाही. मी माझ्या भूमीत पाय रोवून उभा आहे, अशी रणगर्जना करणारे झिल्येन्स्की म्हणूनच जगाच्या इतिहासात कायम नांदले जातील. रशिया निश्चितपणे बलवान आहे. पुतीन यांचा एकूणच आविर्भाव पाहता जगाने आर्थिक निर्बंध लादल्यानंतरही ते कितपत माघार घेतील, याविषयी प्रश्नचिन्हच आहे. तरीदेखील या दोन देशांमध्ये चर्चा होणार असेल, तर ते शुभचिन्ह मानावे लागेल. बेलारूसमध्ये होणाऱया चर्चेचे उद्दिष्ट युद्ध रोखणे, हेच आहे. रशिया सैन्य माघारी घेईल, तेव्हाच हे शक्य होईल, असे झिल्येन्स्की याबाबत म्हणतात. स्वाभाविकच चर्चा होणार का नि त्यातून निश्चित तोडगा निघणार का, याकडे जगाचे लक्ष असेल. हे युद्ध थांबणार की लांबणार, हे आजमितीला सांगणे अवघड आहे. मात्र, ज्या पद्धतीने झिल्येन्स्की यांच्या नेतृत्वाखाली युक्रेनने एकटय़ाने रशियाला टक्कर दिली, ती कौतुकास्पद होय. लिओ टॉलस्टॉय या महान तत्त्ववेत्त्याची ‘वॉर अँड पीस’ ही साहित्यकृती जगभर प्रसिद्ध आहे. त्याचाच देश स्टॅलिनच्या हुकूमशाहीनंतर आता पुतीनशाहीत गुरफटावा, यासारखे दुर्दैव नसावे. टॉलस्टॉय, महात्मा गांधी यांनी जगाला शांततेचा संदेश दिला. परंतु, शांतता वा लोकशाही मूल्यांऐवजी संघर्ष व हुकूमशाहीकडे आजचे अनेक राज्यकर्ते झुकताना दिसतात. म्हणजे या महापुरुषांचे विचार कालबाहय़ झालेत का? तर नाही. हिटलर, स्टॅलिन युग संपल्यानंतर त्या देशांचे काय झाले, हे सर्वांना माहीत आहे. म्हणूनच युद्धाकडून पुन्हा शांततेकडेच वळले
पाहिजे.
Previous Articleदक्षिण कोरियातील राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक
Next Article सत्तेवर आल्यास 5 वर्षे मोफत धान्य देणार
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.