आपल्या प्रत्येकात क्षमता असते. लढण्याची ताकद असते. ही क्षमता ओळखून आपण पुढे जायला हवं, असं अंकिता सांगते.अंगी धाडस आणि समर्पित भावनेने काम करण्याची इच्छा असेल तर काहीच अवघड नसतं असं तिचं म्हणणं आहे. अंकिता फक्त बोलून थांबलेली नाही. तिने आपल्या कृतीतूनही हे दाखवून दिलं आहे. अंकिता एक वर्षांची असताना तिला पोलिओने ग्रासलं.यामुळे तिचा उजवा पाय अधू झाला. तिला कृत्रिम पाय बसवण्यात आला. अंकिताला कुटुंबाने खूप प्रोत्साहन दिलं. तिने शिक्षण घेतलं. अर्थशात्राची पदवीधर झाली. मात्र त्यानंतरचा काळ खूपच कठीण होता. अंकिताला बराच संघर्ष करावा लागला. अंकिता 2009 मध्ये नोकरीच्या शोधात पालिताणाहून अहमदाबादला आली. मात्र तिच्या पदरी निराशाच पडली.
अनेक ठिकाणी अंकिताला नाकारण्यात आलं. अपंग असल्याचं कारण देत नोकरी देणार नसल्याचं सांगण्यात आलं.अपंग व्यक्तीला नोकरी दिल्यास आपल्या कंपनीचं नाव खराब होईल, असंही तिला सांगण्यात आलं. घरात सर्वात मोठी असल्यामुळे अंकितावर सात जणांच्या कुटुंबाची जबाबदारी होती. त्यामुळे तिने मिळेल ती नोकरी, पडेल ते काम केलं. रेस्टॉरंट्समध्ये भांडीही घासली. मात्र यापैकी कोणतीही नोकरी तिच्या क्षमतांना न्याय देणारी नव्हती. आपल्याला यापेक्षा अधिक चांगलं मिळू शकतं, याची तिला जाण होती. तिने जवळपास दहा वर्षं अशा वेगवेगळ्या नोकर्या केल्या. मग मात्र तिने स्वतःचं आयुष्य स्वतः घडवायचं ठरवलं. त्यातच 2019 मध्ये तिच्या वडिलांना कर्करोगाचं निदान झालं. यामुळे अंकिताला पैसा कमावणं गरजेचं होतं. तिच्याकडे अजिबात वेळ नव्हता. तिला नोकरी शोधत बसणं परवडणारं नव्हतं. मग तिने रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला. काही रिक्षाचालक आणि हितचिंतकांनी अंकिताला मदत केली. तिला रिक्षा चालवण्याचे धडे दिले. तसंच हँडब्रेक असणारी रिक्षा उपलब्ध करून दिली. यामुळे अंकिताचं काम अधिकच सोपं झालं. अंकिता दररोज सकाळी साडेदहा ते रात्री साडेआठ या वेळेत रिक्षा चालवते. वडिलांना गरज असताना ती घरी थांबते. रिक्षा चालवण्याची दुसरी वेळ निवडते. रिक्षा चालवण्याच्या कामामुळे वेळा जुळवणं शक्य होत असल्याचं तिचं म्हणणं आहे. अंकिता महिन्याला जवळापास 25 हजार रुपये कमावते. कोणतीही नोकरी तिला एवढा पगार देऊ शकली नसती. अंकिता खूप आनंदी आहे. ती कुटुंबाचा आधार बनली आहे. इतकंच नाही तर तिने अनेक महिलांपुढे आदर्श उभा केला आहे.