शिल्लक खाद्यतेलाच्या दरात आठवडयात किलोला 35 रूपयाची वाढ
प्रतिनिधी / कोल्हापूर
एकीकडे युक्रेनमध्ये लढाई तर दुसरीकडे कोल्हापूरात मात्र, मिसाईल वेगाने खाद्यतेलाच्या दराने उच्चांक केला आहे. युध्दाला फक्त 10 दिवस झाले असतानाच जुना साठा असलेल्या खाद्यतेलाने मात्र किलोला 35 ते 40 रूपयाची वाढ केली आहे. यामुळे सर्वांच्या घरचे बजेट कोलमडून पडल्याने, जनतेमधून संताप व्यक्त केला जात आहे.
महापूर असो, दुष्काळ असो की कोरोना असो याचा फायदा व्यापारी, डॉक्टर व केमिस्ट या व्यावसायिकांनी घेतला असल्याचा आरोप लोकामधून होत आहे. कोरोना, पेट्रोल-डिझेलची दरवाढ यामुळे लोकांचे कंबरडे आधीच मोडले आहे. त्यातच युध्दाला अजून 10 दिवस झाले असताना, खाद्यतेलाच्या दरात मात्र दिवसे-दिवस वाढ होऊ लागली आहे. याचा फायदा होलसेल खाद्यविक्रेत्य़ांनी घेतला आहे. भारतात सध्या तीन महीन्याचा सुर्यफूल,पामतेल,सरकीतेलचा साठा शिल्लक असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच स्थानिक स्तरावर ही जुन्या दराने मोठया प्रमाणावर खाद्यतेलाचा साठा असताना, अवघ्या एका आठवडयात किलोला 35 ते 40 रूपयाची दरवाढ झाली आहे याचे गौडबंगाल काय ? असा प्रश्न आता जनतेसमोर उभा राहीला आहे. मात्र होलसेल विक्रेत्याकडून, जागेवरच दर वाढ झाल्याने ही दरवाढ झाली असल्याचे सांगण्यात येत आहे.
हे खाद्यतेल परदेशातून आयात होते हे खरे आहे. यासाठी किमान कांही दिवस लागते. त्यावेळच्या दरात खाद्यतेलाची खरेदी झाली असताना युध्दाच्या नावाखाली ही दरवाढ करून, जनतेला लूटले जात असल्याचा आरोप आता होऊ लागला आहे. .याचा फटका जनतेबरोबर हॉटेल,खाद्यपदार्थ गाडयांना बसू लागला आहे. कांही खाद्य विक्रेत्य़ांनी पदार्थांचे दर वाढवले आहेत. तर डब्याने घेणारे आता एक लिटरच्या तेल पिशवीकडे वळू लागले आहेत. युक्रेनमधील विद्यार्थी अजून भारतात येण्यापूर्वीच खाद्यतेलाच्या दरात वाढ होत आहे. हे अजब आहे.
व्यापाऱ्याकडे जुना तेल साठा असताना युध्दाच्या नावाखाली जादा दराने खाद्यतेलाची विक्री सुरू आहे. खाद्यतेलाचा तुटवडा निर्माण होईल या भितीने खाद्यतेल दुकाने,किराणा दुकाने यामध्ये खाद्यतेलाचा दर व खरेदीची मागणी वाढत चालली आहे.