गोमंतकन्येला श्रद्धांजली म्हणून राज्यात तीन दिवसांचा दुखवटा : मुख्यमंत्री सावंत यांचा अंत्ययात्रेत सहभाग,पक्षांच्या निवडणूक सभा रद्द
प्रतिनिधी /पणजी
विश्वविख्यात गोमंतकीय गान कोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनाने गोव्यात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात आली. राज्यातील जनतेने दुःख व्यक्त केले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी लता मंगेशकर यांच्या निधनाने संगीत क्षेत्राची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे. लताताई गेल्या परंतु त्यांच्या जादूई आवाजाने त्या अजरामर राहिल्या, अशा शब्दात्ं श्रद्धांजली वाहिली. या गोमंत कन्येला आदरांजली वाहण्यासाठी राज्य सरकारने तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे.
मंगेशकर यांच्या दुःखद निधनामुळे भाजपाने आपले पूर्वनियोजित सर्व कार्यक्रम स्थगित केले आहेत. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या सभा व जाहीरनाम्याचे प्रकाशन पुढे ढकलण्यात आले आहे.
मुख्यमंत्री मुंबईकडे रवाना
स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनाचे वृत्त समजताच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर मुंबईला रवाना झाले. मुंबईत त्यांनी लतादिदींच्या अंत्ययात्रेत सहभागी होऊन गोवा सरकारच्यावतीने लतादिदींच्या पार्थिवावर पुष्पचक्र वाहिले.
पंतप्रधानांची भेट
लतादिदींच्या अंत्यसंस्काराच्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नवी दिल्लीहून मुंबईला आले. मुंबई विमानतळावर त्यांचे स्वागत करण्यासाठी महाराष्ट्रचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मंत्री आदित्य ठाकरे तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे उपस्थित होते. त्यानंतर डॉ. सावंत हे पंतप्रधानांच्या ताफ्याबरोबरच थेट शिवाजी पार्कवर गेले.
स्वर अनेक पिढय़ा गुंजत राहणार : मुख्यमंत्री
स्वरसम्राज्ञी तथा भारतरत्न लता मंगेशकर यांच्या जाण्याने देशभरात शोककळा पसरली आहे. गेली 6 दशके त्यांनी भारतीय संगीतात अधिराज्य गाजवले. नाम गुम जायेगा.. चेहरा ये बदल जायेगा… मेरी आवाज ही पहचान है’’…हे त्यांचे स्वर शब्दशः खरे ठरले आहेत. गेल्या तीन पिढय़ांची सकाळ लतादीदी यांचे विविध भारतीवर लागणाऱया गाण्यांनी व्हायची. पहाटे त्यांच्या आवाजातील भूपाळी ऐकून दिवसाची छान सुरुवात व्हायची. पहाटे उठल्यापासून ते शाळेला जायच्या तयारी पर्यंत लतादीदी यांचा स्वर कानात गुंजत असायचा. ऐ मेरे वतन के लोगो… हे गाणे तर कधीही ऐकले डोळय़ात अश्रू आल्याशिवाय राहत नाहीत. देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले सर्वस्व अर्पण केलेल्या क्रंतिव्रिरांच्या भावना समस्त भारतीयांपर्यंत पोहोचवण्याचे अमूल्य काम लतादीदींनी केले. सुमारे 900 पेक्षा अधिक चित्रपटांत आपला स्वर दिलेल्या लतादीदींचा आवाज पुढील अनेक पिढय़ा गुंजत राहील, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी लताताईंना आदरांजली वाहिली आहे.
दिदी अनादी अनंत आहे : कामत
दिदी अनादी अनंत आहे. भारतरत्न लता मंगेशकरांना आपली आदरांजली. त्यांचे कुटुंबीय, मित्रपरिवार व असंख्य चाहत्यांना माझ्या सहवेदना, असे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत म्हणाले.
स्वाभिमानाचा एक महत्त्वाचा मानबिंदू हरपला : वेलिंगकर
गोमंतकाच्या अभिमान व स्वाभिमानाचा एक महत्वाचा मानबिंदू हरपला! स्व. लतादिदी गानविश्वात कधीही भरून न येणारी पोकळी सोडून निघून गेल्या. आमच्या जीवनकालात स्व. लतादीदींसारखी आंतरराष्टारीय स्तरावर संगीतक्षेत्रात तळपणारी विभूति होऊन गेली हे आमचं सौभाग्य समजतो. त्या स्वर्गही पावन करतील असेच वाटते. त्यांच्या पवित्र आत्म्यास सद्गति लाभो, असे सुभाष भास्कर वेलिंगकर म्हणाले.
जगाला गोव्याची ओळख करून दिलेला सूर हरपला !
गानतपस्वी, भारतरत्न गोमंतकीय सुकन्या लतादीदी मंगेशकर म्हणजे एक अद्भूत चमत्कार. इश्वरीय अलौकिक देणगी श्रीमंगेशाचा कृपाशीर्वाद व छत्र लाभलेले मंगेशकर कुटुंबीय म्हणजे गोव्याच्या कला आणि संगीत क्षेत्रातील मुकूटमणी. मंगेशकरांचा गोवा अशी संपूर्ण जगाला ओळख करून दिलेल्या लतादिदींचा सूर आज अनंतात विलीन झाला. गोमंतक मराठा समाजाच्या सुकन्या असलेल्या लतादिदींना समाजातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो, असे गोमंतक मराठा समाजाचे अध्यक्ष आनंद घ. वाघुर्मेकर यांनी म्हटले आहे.
लतादिदी प्रत्येकाच्या मनात राहतील : पर्रीकर
गान कोकिळा लतादिदीचे निधन ही मोठी दुःखद घटना आहे. आपल्या आवाजाच्या माध्यमातून गोव्याचे नाव उज्वल करणाऱया स्वरसम्रज्ञी लता दिदी आज आमच्यात नसल्या तरी त्यांनी गायिलेल्या गाण्यातून त्या प्रत्येकाच्या मनात कायमस्वरूपी घर करून रहातील, असे उत्पल पर्रीकर यांनी सांगितले.
भारतीय संगीताचा आत्मा हरपला : सरदेसाई
लता मंगेशकर यांच्या निधनाने भारतीय संगीताचा आत्मा आज शांत झाला असे गोवा फॉरर्वडचे सर्वेसर्वा विजय सरदेसाई म्हणाले. लता मंगेशकर यांनी गयिलेल्या गाण्यातून केवळ संगीत क्षेत्रातीलच नव्हे तर सर्व क्षेत्रातील लोकांना आनंद मिळाला आहे. त्या आज आमच्यातून निघून गेल्या हे मोठे दुःख आहे असेही सरदेसाई म्हणाले.
आनंद, शांती बहाल करणारा स्वर शांत झाला : पार्सेकर
भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनामुळे अतिशय दुःख होत असून देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो हीच प्राथना. लता मंगेशकर या भारताच्या गानकोकिळा होत्या. आनंद आणि शांती बहाल करणारा स्वर शांत झाला, असे लक्ष्मीकांत पार्सेकर म्हणाले. आज स्वर अनाथ झाले, अशी प्रतिक्रिया ऍड. नरेंद्र सावईकर यांनी व्यक्त केली.
… हे आम्ही आमचे भाग्य समजतो : धारवाडकर
पर्वरी येथील गोमंतक मराठी अकादमीच्या मराठी भवनाचा शिलान्यास लतादीदींच्या शुभहस्ते पार पडून वास्तु तयार झाली हे आम्हीं आमचे भाग्य समजतो. दीदींच्या दुःखद निधनाबद्दल तत्कालीन मराठी भवन निर्माण समिती त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहे. ईश्व्ा्रर दीदींच्या आत्म्याला शांती देवो ही नम्र प्रार्थना!, असे दिलीप धारवाडकर, तत्कालीन कोषाध्यक्ष, मराठी भवन निर्माण समिती यांनी सांगितले.
लतादिदींचे निर्वाण गोव्याच्या संगीतासाठी दुःखद घटना
गोव्यासाठी लता मंगेशकर म्हणजे सुरांचे दैवतच, ज्यांच्या अस्तित्वामुळे गोवा हे संबंध जगाचे आकर्षण ठरले. गोव्याला जगाच्या नकाशावर विराजमान करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. आज गोव्यात जे संगीत आहे, त्याला लतादिदींचे आशीर्वाद आहेत. लतादिदींचे निर्वाण ही इथल्याही संगीतासाठी दुःखद घटना आहे, असे प्रेमानंद आमोणकर, संचालक-संगीत विभाग गोवा कला अकादमी म्हणाले.
लतादिदी गोमंतकीयांच्या ह्रदयात युगानुयुगे राहतील
लता मंगेशकर यांच्या निधनाने केवळ संगीत क्षेत्रातच नव्हे तर साहित्य क्षेत्राचीही अपरिमित हानी झाली आहे. 1990 मध्ये पर्वरी येथे त्यांचा सत्कार करण्याचे भाग्य गोव्याच्या मराठी पत्रकार संघाला लाभले. आपण या आयोजनाचा एक घटक होतो. लतादिदी आमच्यात नाहीत, परंतू त्या सदैव प्रत्येक गोमंतकीयांच्या ह्रदयात युगानुयुगे राहतील यात शंकाच नाही, असे रमेश वंसकर, अध्यक्ष गोमंतक साहित्य सेवक संघ यांनी सांगितले.
लतादिदींची गाणी पुढच्या अनेक पिढीसाठी प्रेरणादायी ठरतील
लता मंगेशकर यांनी अलौकिक आणि दैवी स्वरांच्या माध्यमातून समृद्ध आणि वैभवसंपन्न संगीताची निर्मिती केली. ऐकणाऱयाच्या ह्रदयाला साद घालणारी त्यांची गाणी पुढच्या अनेक पिढय़ांसाठी प्रेरणादायी ठरतील, असे प्रा. अनिल सामंत, अध्यक्ष गोवा मराठी अकादमी म्हणाले.
असा कोहिनूर पुन्हा होणे नाही : ढवळीकर
‘भारतरत्न’ लता मंगेशकर यांचा सूर म्हणजे स्वर्गीय संगीत. संपूर्ण विश्वाला त्यांनी आपल्या कंठ संगीताने मोहिनी घातली. देशातील अनेक भाषांमधून त्या गायिल्या. त्यांचे देशप्रेम आणि देशाभिमान सर्वज्ञात होता. वैश्विक संगीतातील ‘को†िहनूर’ पुन्हा होणे नाही, असे आमदार सुदिन ढवळीकर यांनी सांगितले.
त्यांची उणीव नक्कीच भासेल : कमलाकर नाईक
भारतरत्न गानकोकीळा लता मंगेशकर यांच्या निधनाची वार्ता पचविणे कठिण झाले. त्यांच्या कंठसंगीतापुढे सगळ्याच उपमा, बिरूदे कमी पडतील एवढी शक्ती त्यांच्या गाण्यात होती. दिव्यत्वाची प्रचिती देणारी त्यांची वाणी येणाऱया हजारो वर्षात रसिकांना आनंद देईल हे जरी खरे असले तरी त्यांची उणीव नक्कीच भासेल, असे निवृत्त प्राचार्य गोवा संगीत महाविद्यालय, प्रा. कमलाकार नाईक म्हणाले.