लता मंगेशकर हा कदापि न संपणारा विषय आहे. किती सांगावे, लिहावे, बोलावे, ऐकावे तेवढे थोडेच आहे. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं आहे ते, हा विषय कधीच संपू नये….आणि तीच त्यांना श्रद्धांजली.
काही यशस्वी व्यक्तिमत्वांबाबत सांगावे तेवढे थोडेच असते. त्यांच्या चौफेर, अष्टपैलू वाटचालीतील अगणित पैलू, त्यांची स्वभाववैशिष्टय़े याबाबत बरेच काही सांगता येईल. पण त्याचा शेवट असा होणार नाही. लता मंगेशकर यापैकीच एक. त्यांच्या वैभवशाली, दिमाखदार, बहुरंगी वाटचालीचा वेध घेताना असं म्हणावेसे वाटते की, या एकाच व्यक्तीला हे सगळे साध्य झाले हीच केवढीतर कौतुकाची गोष्ट आहे.
गायिका आणि पार्श्वगायिका ही त्यांची प्रमुख ओळख. पण त्यासह त्यांच्या वैभवशाली कर्तृत्वाचे अनेक पैलू आपल्याला दिसतात. आणि त्यांच्या त्याच अष्टपैलू कर्तृत्वाचा विविध पारितोषिकांनी गौरव करण्यात आला. अगदी आवर्जून सांगायला हवे ते, चित्रपट क्षेत्रासाठीचा सर्वोच्च असा दादासाहेब फाळके पुरस्कार (1989) त्यांना देऊन गौरवण्यात आले. तसेच 1969 साली त्यांना भारत सरकारच्या वतीने ‘पद्मभूषण पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. विशेष म्हणजे मध्य प्रदेश शासनाच्या वतीने 1984 पासून संगीत क्षेत्रात भरीव योगदान असलेल्यांना लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. काही नावे सांगायची तर, संगीतकार नौशाद (1984), पार्श्वगायक किशोरकुमार (1985), संगीतकार जयदेव (1986), पार्श्वगायक मन्ना डे (1987), संगीतकार खय्याम (1988), पार्श्वगायिका आशा भोसले (1989) वगैरे वगैरे. ज्यांच्यासोबत लतादीदींना संगीत क्षेत्रात काम करण्याचा योग जुळून आला त्यांना हा पुरस्कार प्राप्त झाला.
वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी दीदींनी शास्त्रीय गायन केले. मराठी चित्रपटासाठी त्या सर्वप्रथम किती हसाल (1942) या चित्रपटासाठी नाचू या गडे खेळू सारी, मनी हौस भारी (संगीतकार सदाशिवराव नेवरेकर) हे गाणे गायल्या. पण काही कारणास्तव हे गाणे त्या चित्रपटात समाविष्ट होऊ शकले नाही. तर हिंदी चित्रपटासाठी त्या सर्वप्रथम आप की सेवा मे, या चित्रपटासाठी पा लागू कर जोरी रे, श्याम मोसे ना खेलो होरी (संगीतकार दत्ता डावजेकर) हे गाणे गायल्या.
चाळीसच्या दशकात त्यांनी काही मराठी व हिंदी चित्रपटात अभिनय केला. पहिली मंगळागौर (1942), माझं बाळ (1943), चिमुकला संसार ( 1943), गजाभाऊ (1944), छत्रपती शिवाजी या मराठी चित्रपटात तसेच बडी माँ (1945), जीवन यात्रा (1946), सुभद्रा (1946), मंदिर (1948) अशा हिंदी चित्रपटात त्यांनी भूमिका साकारलीय. त्या काळात काही कलाकार हे अभिनय आणि गायन असे दोन्ही गोष्टी साकारत.
रामराम पाव्हणं (1950), मोहित्यांची मंजुळा (1962), मराठा तितुका मेळवावा (1964). साधी माणसं (1965), तांबडी माती (1969) या चित्रपटांना लता मंगेशकर यांनी आनंदघन या नावाने संगीत दिले आणि त्यांच्या कर्तृत्वाचा आणखीन एक विशेष पैलू दिसून आला. माझ्या शेतात सोनचं पिकतयं, तू गुपित कुणाला सांगू नको आपुले, शपथ दुधाची या आईच्या (रामराम पाव्हणं), बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला, झाला साखरपुडा गं बाई थाटात (मोहित्यांची मंजुळा), अखेरचा हा तुला दंडवत, रेशमाच्या रेघानी लाल काळ्या धाग्यांनी, शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती (मराठा तितुका मेळवावा), ऐरणीच्या देवा तुला ठिनगी ठिनगी व्हाऊं दे, माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पाणी जातं, नको देवराया अंत आता पाहू (साधी माणसं), जीवा शिवाची बैलगाडी (तांबडी माती). आदी चित्रपट संगीतात त्यांनी विविधता दिली. श्रोत्यांच्या सहजी तोंडी गुणगुणली जातील अशी गाणी लता मंगेशकर यांनी देत आपले संगीतकार म्हणून कसब आणि कौशल्य दाखवले हे विशेषच आहे. त्याचप्रमाणे त्यांनी वादळ (1953) हा मराठी चित्रपट तसेच झांझर (1953), कंचन (1955), लेकिन (1991) या हिंदी चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली. लेकिन या पुनर्जन्मावर आधारित गोष्टीवरील आधारित गुलजार दिग्दर्शित चित्रपटात विनोद खन्ना, डिंपल खन्ना आणि अमजद खान यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचा मुहूर्त परेलच्या राजकमल कलामंदिर स्टुडिओत मुहूर्त झाला.
लता मंगेशकर यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर चार वेळा मानाचा फिल्म पुरस्कार प्राप्त केला. पण त्यानंतर त्यांनी अन्य गायकांना हा पुरस्कार प्राप्त व्हावा म्हणून या पुरस्कारासाठी आपला विचार करण्यात येऊ नये असे अतिशय नम्रपणे सांगितले. यातून त्यांचा इतरांच्याही कार्यकर्तृत्वाला दाद मिळावी असाच सकारात्मक दृष्टिकोनातून विचार केला. लता मंगेशकर यांना आजा रे परदेसी मै तो कबसे खडी (मधुमती, 1958), कही दीप जले कहीं दिल (बीस साल बाद, 1962), तुम्ही मेरे मंदिर तुम्ही मेरी पूजा (खानदान, 1965), आप मुझे अच्छे लगने लगे (1969) या गाण्यांसाठी फिल्म फेअर पुरस्कार प्राप्त झाला. दीदींच्या काही विशेष आवडीनिवडी अशा, रंग सफेद, सण दिवाळी, शहर मुंबई आणि न्यूयॉर्क, खेळ क्रिकेट, फूटबॉल आणि टेनिस, विशेष छंद फोटो काढणं आणि स्वयंपाकघरात रमणे. कालांतराने आपल्या छंदाला त्यांना आवर घालावा लागला.
आनंदघन- दिलीप ठाकूर, मुंबई
लता मंगेशकर यांनी 1946 साली हिंदी चित्रपट गीत गायनास सुरुवात केली. तेव्हा ग्रामोफोनचा काळ होता. तसेच एखाद्याच कुटुंबात रेडिओ असे. साठच्या दशकात हळूहळू शहरी मध्यमवर्गात रेडिओ येऊ लागला. त्या काळात लाऊडस्पीकरवर गाणी ऐकत. तसेच इराणी हॉटेलमधील जुक्स बॉक्समध्ये दहा पैशाचे नाणे टाकून आपले आवडते गाणे ऐकता येई. सत्तरच्या दशकात दूरचित्रवाणीचे आगमन झाले. एंsशीच्या दशकाच्या सुरुवातीला रंगीत दूरदर्शन व व्हिडिओ आला आणि मग दशकभरानंतर उपग्रह वाहिन्यांचे युग आले. कालांतराने मोबाईल आला. आणि मग यू टय़ूब आले. या तांत्रिक प्रगतीसह लता मंगेशकर यांच्या जुन्या आणि नंतरच्या काळातील गाण्यांची वाटचाल सुरु राहिली. माध्यमे बदलली आणि वाढली. पण लतादीदींच्या गाण्यांची लोकप्रियता कायम राहिली.
लता दीदी बनल्या आनंदघन
गायिका म्हणून स्वरांवर असलेली हुकूमत लता मंगेशकर यांच्या सुरेल गळय़ात जितकी पक्की होती तितक्याच त्या संगीतकार म्हणूनही रसिकमनांवर कोरल्या गेल्या आहेत.
गायिका म्हणून त्या सर्वश्रेष्ठ होत्याच, पण त्यांनी संगीतकार म्हणूनही मोठे योगदान दिले आहे. ‘आनंदघन’ या नावाने त्यांनी संगीतकार म्हणून केलेला छोटासा, पण प्रतिभावान प्रवास चिरस्मरणीय ठरला आहे. चालींमधील वैशिष्टय़पूर्ण माधुर्यामुळे त्यांनी संगीतबद्ध केलेली गाणी मराठी रसिकांच्या ओठी आजही रुळताना दिसत आहेत. लता मंगेशकरांनी संगीतकार या नात्याने पाच सिनेमांना संगीत दिले. यातील प्रत्येक गाणे कमालीच्या गोडव्याने भारले आहे. अशी गाणी काळजाच्या कोपऱयात जाऊन कायमची विसावतात, त्या वेळी त्या संगीताची, संगीतकाराची महती लक्षात येते. 1950 मध्ये आलेल्या दिनकर पाटील यांच्या ‘रामराम पाव्हणं’ या सिनेमानं दीदींचा संगीतकार म्हणून प्रवास सुरू झाला. सुरूवातीला त्यांनी आपल्या नावानेच संगीत दिले. तमाशापट असलेल्या या चित्रपटात ‘माझ्या शेतात सोनं पिकतंय’ हे गाणे त्यांनी नामवंत संगीतकार सी.रामचंद्र तसेच बहीण मीना मंगेशकर यांच्या साथीने गायले होते. ‘शपथ दुधाची या आईच्या’, ‘तू गुपित कुणाला सांगू नको’ या सिनेमातील आणखी दोन गाण्यांशिवाय ‘कशी जडली सांग तुझ्यावरती माझी प्रीती’ तसेच ‘राया गालात खुदकन हसा’ ही तमाशातील संगीताच्या चालीने दिलेली गाणी लाजवाब होती. प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक भालजी पेंढारकर यांच्या सिनेमांना लतादीदींनी दिलेले संगीत हा एक सांगीतिक अभ्यासाचा विषय होऊ शकतो. मोहित्यांची मंजुळा, मराठा तितुका मेळवावा, साधी माणसं आणि तांबडी माती असे लागोपाठ चार सिनेमांतील एकापेक्षा एक सरस गाणी एक संगीतकार म्हणून किती श्रेष्ठ दर्जाच्या होत्या हे त्यांनी दाखवून दिले. रसिकांना काय द्यायचे आहे, हे संगीतकार म्हणून बाईंना अचूक गवसले होते. इतिहासपट आणि सामाजिक जाणिवा दृढ करणारे हे चार सिनेमे होते. त्यातील प्रत्येक गाणे नीट ऐकले, तर लक्षात येते की ते आपल्या मराठी मातीशी घट्ट नाते सांगणारे असून, तांबडय़ा मातीच्या नादमाधुर्याने ते तनामनाला भारावून टाकणारे आहे. आनंदघन संगीतकार म्हणून दिग्गज का आहेत, हे यावरून सहज पटते. सहा दशके उलटून गेल्यानंतरही त्या काळातील गाणी अजरामर आहेत आणि त्यात आनंदघन यांच्या संगीताचा अनमोल वाटा आहे.
1950 च्या आधीपासून दीदींचा पार्श्वगायिका म्हणून सुरू झालेला प्रवास 60 आणि 70 च्या दशकांत प्रतिभेच्या सर्वोच्च उंचीवर पोहोचला होता. दरम्यान त्यांनी आपल्यातील भालजी पेंढारकर यांच्यासारख्या दिग्गज दिग्दर्शकाच्या जोडीने आपल्यातील संगीतकारालाही पारखून घेण्याचा प्रयत्न केला. ‘बाई बाई मनमोराचा कसा पिसारा फुलला’, ‘झाला साखरपुडा’, ‘निळ्या आभाळी’, ‘सोन सकाळी सर्जा’ ही 1963 मध्ये आलेल्या मोहित्यांची मंजुळामधील गाणी आणि त्यानंतर वर्षभराने आलेल्या ‘मराठा तितुका मेळवावा’ या सिनेमातील शूर आम्ही सरदार, नाव सांग सांग गाव सांग, रेशमाच्या रेघांनी, अखेरचा हा तुला दंडवत, मराठी पाऊल पडते पुढे ही गाणी शिवकालीन काळ डोळ्यासमोर आणतातच, पण दगडाच्या देशा, कणखर देशाच्या राकटपणाबरोबर मराठी मातीच्या पराक्रमाचीही महती गाताना दिसतात. याशिवाय शिवाजी महाराजांच्या जोडीने स्वराज्यासाठी लढणाऱया मावळ्यांच्या जोडीदारांच्या मनाची ओढ, व्यथा अशा काही शब्दात सांगून जातात, की आपण त्या सिनेमाशी आणि गाण्यांशी आयुष्यभर जोडले जातो. बाई बाई मनमोराचा पिसारा, निळ्या आभाळी, अखेरचा हा तुला दंडवत या गाण्यांच्या चालींबरोबरच एक गायक म्हणून त्याचा लागलेला स्वर काळजात कायमचा विसावतो. दीदींबरोबरच आशा भोसले व हृदयनाथ मंगेशकर यांनी याच सिनेमांमध्ये गायलेली गाणी ही सोन्याहून लखलखणारी ठरलीत. ‘शूर आम्ही सरदार’ हे घोडय़ांच्या टापांबरोबर हृदयनाथांच्या आवाजात पुढे जाणारे गाणे असो की ‘रेशमाच्या रेघांनी’ हे आशाबाईंनी गायलेले गाणे स्तुती करण्यासाठी शब्द कमी पडतील, इतकी ती भारावून टाकतात. याशिवाय नाव सांग सांग गाव सांग ः आशा व हृदयनाथ आणि मराठी पाऊल पडते पुढे ः लता व हृदयनाथ अशी डय़ुएट गाणीही अविस्मरणीय ठरली आहेत. मोजकेच सिनेमा देऊनही आनंदघन यांचे संगीत खूपवरच्या दर्जाचे ठरले. त्याला गावाकुसांतील माणसांची भाषा बोलणाऱया साधी माणसे व तांबडी माती या सिनेमातील गाणी कारणीभूत ठरलीत! वाट पाहूनी जीव शिणला, राजाच्या रंग महाली, नको देवराया, ऐरणीच्या देवा तुला, मळ्याच्या मळ्यामंधी ही साधी माणसंमधील गाणी ऐकली तर जीव शांतसुखांत होतो. एक आत्मिक आनंद लाभतो आणि लताबाईंनी संगीतकारांसाठी घेतलेले ‘आनंदघन’ हे नाव सार्थ ठरते! ऐरणीच्या देवा तुला या अजरामर गाण्यासाठी आनंदघन यांनी हरीप्रसाद चौरासिया यांच्या बासरी वादनाचा अप्रतिम असा उपयोग केला होता. ‘साधी माणसं’या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार तर मिळालाच, पण राज्य पुरस्काराबरोबर आनंदघन यांना सर्वोत्तम संगीतकार तसेच लतादीदींना सर्वोत्तम पार्श्वगायिकेचा पुरस्कार मिळाला. 1969 मध्ये आलेल्या तांबडी मातीच्या गाण्यांनी तर कमाल केली. मागते मन एक काही, अपर्णा तप करीते काननी, माझ्या कपाळीचे कुंकू, जा जा रानीच्या पाखरा, डौल मोराच्या मानेचा, जिवा शिवाची बैल जोड या गाण्यांनी आनंदघनच्या नावाआडून लतादीदींमधील संगीतकाराची प्रतिभाच अधोरेखित केली. या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.
संकलन – अनुराधा कदम