मणिपूरमध्ये पंतप्रधानांची पहिली प्रचारसभा ः
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी मणिपूरमधील हिंगांग येथील प्रचारसभेला संबोधित केले आहे. मणिपूरसह पूर्ण ईशान्य क्षेत्र पूर्व आशियासोबत भारताच्या व्यापाराचे प्रवेशद्वार आहे. याचमुळे भाजप सरकारने मणिपूरला रेल्वेच्या नकाशावर आणले आहे. जीरीबामला रेल्वेशी जोडून 5-6 वर्षे झाली आहेत. काही दिवसांपूर्वी राणी गाइदिन्ल्यू स्थानकावर पहिली मालगाडी पोहोचल्यावर येथील लोकांसोबत मलाही मोठा आनंद झाला. आता राजधानी इंफाळपर्यंत रेल्वे धावण्याचा दिवस देखील दूर नाही. मणिपूर रेल्वेद्वारे पूर्ण देशाशी जोडले जाणार असल्याचे मोदींनी प्रचारसभेत बोलताना म्हटले आहे.
काँग्रेस पक्ष ईशान्येतील लोकांच्या भावनांना आणि येथील लोकांच्या समस्यांना कधीच समजू शकला नाही. परंतु रालोआ सरकारने ईशान्येला अष्टलक्ष्मी मानून भारताच्या विकासाचे इंजिन मानून काम करत आहे. जनतेची सेवा, विकास यालाच आमची प्राथमिकता आहे. मणिपूरमधील जनतेने भाजपचे गुड गव्हर्नन्स (सुशासन) आणि गुड इंटेन्शन (सद्हेतू) पाहिले आहे. मागील 5 वर्षांमध्ये आम्ही केलेल्या मेहनतीमुळे पुढील 25 वर्षांसाठी एक ठोस पाया रचला गेल्याचे उद्गार मोदींनी काढले आहेत.
पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत मणिपूरमध्ये 60 हजारांहून अधिक घरे बांधण्यात आली आहेत. यातील बहुतांश घरांवर मालकी हक्क हा महिलांचा आहे. मागील दशकांमध्ये येथील लोकांनी अनेक सरकारे, त्यांचे कामकाज आणि कृत्ये पाहिली आहेत. दशकांच्या काँग्रेस शासनात मणिपूरला विषमता आणि असंतुलित विकासच मिळाला. परंतु मागील 5 वर्षांमध्ये भाजपच्या डबल इंजिन सरकारने मणिपूरच्या विकासासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केल्याचे उद्गार मोदींनी काढले आहेत.
ही निवडणूक मणिपूरची पुढील 25 वर्षे निर्धारित करणारी आहे. स्थैर्य आणि शांततेची प्रक्रिया या 5 वर्षांमध्ये सुरू झाली असून ती आता कायमस्वरुपी करायची आहे. याचमुळे मणिपूरमध्ये भाजपच्या नेतृत्वाखाली पूर्ण बहुमताचे सरकार सत्तेवर येणे आवश्यक आहे. मणिपूरमध्ये देशातील पहिले क्रीडा विद्यापीठ निर्माण करण्यात आले असून यामुळे हे क्षेत्र खेळांचे आंतरराष्ट्रीय केंद्र ठरणार आहे. भाजप सरकार पूर्ण ईशान्येत क्रीडा गुणवत्तेला प्रोत्सान देत असून क्रीडाविषयक सुविधांकरता गुंतवणूक करत असल्याचा दावा मोदींनी केला.
काँग्रेसकडून संस्कृतीची थट्टा
काँग्रेसने कधीच मणिपूरमधील लोकांच्या सामर्थ्यावर विश्वास दाखविला नाही. आजही काँग्रेसचे नेते राज्यात येऊन मोठमोठय़ा घोषणा करतात. परंतु अन्य राज्यांमध्ये जाताच ईशान्येतील संस्कृती, ईशान्येतील पोशाखाची थट्टा करू लागतात. भाजप सरकारने मणिपूरमध्ये अशक्य ते शक्य केले आहे. बंद आणि कोंडीपासून मणिपूरमधील शहरे तसेच गावांना दिलासा मिळवून दिला आहे. अन्यथा काँग्रेस सरकारच्या काळात केवळ बंद आणि कोंडीचे प्रकार घडत होते असे मोदींनी म्हटले आहे.