सरकारकडे पाठविण्यात आला प्रस्ताव
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव जिह्यातील विविध न्यायालयांमधील 13 विशेष सरकारी वकील पदे भरावयाची आहेत. यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. काही जणांनी अर्ज केले असून त्या अर्जांची छाननी करून उच्च न्यायालयाच्या प्रशासकीय विभागाकडे अर्ज पाठविण्यात आले आहेत. कंत्राटी पद्धतीने ही पदे भरली जाणार आहेत. त्यानंतर कायमस्वरुपी सरकारी वकिलांची नियुक्ती केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली.
बेळगाव विभागात येणाऱया सात जिह्यात एकूण 38 पदे रिक्त असून त्याबाबत सरकारकडे पाठपुरावा करण्यात आला आहे. इच्छुकांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. पुढील महिन्यात रिकामी असलेल्या वकिलांच्या जागा कंत्राटी पद्धतीने भरल्या जाणार आहेत. लवकरच कायमस्वरुपी सरकारी वकिलांची नियुक्ती केली जाणार आहे, असे न्यायालयाच्या प्रशासकीय विभागाने सांगितले.
बेळगाव जिह्यातील खानापूर 2, चिकोडी 1, अथणी 4, रायबाग 2, रामुदर्ग 2 आणि निपाणी 1, हुक्केरी 1 अशी एकूण 13 साहाय्यक सरकारी वकिलांची पदे भरण्यात येणार आहेत. सध्या बऱयाच न्यायालयांमध्ये सरकारी पदे नसल्यामुळे समस्या निर्माण होत आहेत. इतर वकिलांवर त्याचा ताण पडत आहे. त्यामुळे तातडीने या जागा भराव्यात, अशी मागणी होत आहे. खटल्यामध्ये सरकारी वकिलांची भूमिका महत्त्वाची असते. सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यास त्यांचा महत्त्वाचा वाटा असतो. मात्र, काही न्यायालयांमध्ये सरकारी वकीलच नाहीत. त्यामुळे मोठी समस्या निर्माण झाली असून पक्षकारांना तारखा दिल्या जात आहेत. तेव्हा तातडीने त्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी होत आहे.