पक्ष व्यवस्थापनावर केला जातीयवादाचा आरोप
प्रतिनिधी /पणजी
दोन महिन्यांपूर्वीच तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले फोंडय़ाचे माजी आमदार लवू मामलेदार यांनी शुक्रवारी अचानक त्या पक्षाचा राजीनामा दिला. त्यामुळे राज्यात तर्कवितर्कांना प्रचंड उत आला आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना लिहिलेल्या राजीनामा पत्रात, श्री मामलेदार यांनी तृणमूल काँग्रेसने विधानसभा निवडणूक प्रचारासाठी नियुक्त केलेल्या कंपनीच्या कार्यपद्धतीला कंटाळून आपण राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे. या कंपनीला गोमंतकीयांची नाडी माहीत नाही, असा आरोपही त्यांनी केला आहे.
गोव्यातील सर्वात जुन्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे फोंडय़ाचे माजी आमदार असलेले श्री. मामलेदार यांनी नंतर मगोशी नाते तोडले होते. त्यामुळे गत पाच वर्षांपासून ते राजकारणापासून अलिप्तच होते. त्यानंतर दि. 29 सप्टेंबर रोजी गोव्याचे माजी मुख्यमंत्री लुईझिन फालेरो, माजी काँग्रेस प्रवक्ते यतिश नाईक, काँग्रेसचे माजी सरचिटणीस विजय पै आदींसह त्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
मात्र नंतरच्या घडामोडीत मगो पक्षाने तृणमूल काँग्रेस पक्षाशी जुळवून घेऊन युती केली. त्यामुळे आपल्या राजकीय दुश्मन असलेल्या पक्षाशी सोयरीक जुळवलेल्या पक्षामध्ये आपण राहू शकत नव्हतो, असे मामलेदार यांनी सांगितले. धार्मिक सलोखा जपणारा प्रदेश म्हणून गोव्याची जागतिक ख्याती आहे. हिंदू ख्रिश्चन, मुस्लीम हे सर्वजण सलोख्याने राहतात. परंतु सध्या तृणमूलने नियुक्त केलेल्या कंपनीने येथील हिंदू, ख्रिश्चन लोकांमध्ये फूट पाडून धार्मिक सलोख्यास बाधा आणण्याचे प्रयत्न चालविले असल्याचा गंभीर आरोपही मामलेदार यांनी केला.
पक्षाच्या भवितव्यावर परिणाम नाही : फालेरो
दरम्यान, मामलेदार यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया देताना खासदार लुईझिन फालेरो यांनी एखाद्या व्यक्तीच्या राजीनाम्यामुळे पक्षाच्या भवितव्यावर कोणताही परिणाम होणार नाही, असा दावा त्यांनी केला. तृणमूल पक्षात प्रवेश केलेले सर्वजण गोमंतकीय आहेत. त्यामुळे या पक्षावर पश्चिम बंगालमधील लोकांचे नियंत्रण आहे असे म्हणणे चुकीचे आहे, असेही फालेरो म्हणाले.