आसाममधील प्रचारात अमित शहा यांचे आश्वासन
गुवाहाटी / वृत्तसंस्था
आसाममध्ये विधानसभा निवडणूक प्रचार शिगेला पोहचला आहे. आज शनिवारी पहिल्या टप्प्याचे मतदान होणार आहे. सर्व पक्षांनी आपापल्या मान्यवर नेत्यांना प्रचार कार्यात उतरविले आहे. भाजपच्या प्रचाराची धुरा केंद्रीय गृहमंत्री आणि माजी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे सांभाळत आहेत. त्यांनी आसामचा प्रत्येक भाग पिंजून काढला आहे. कोणत्याही परिस्थितीत आसामच्या संस्कृतीचे संरक्षण परकीय घुसखोरांपासून केले जाईल, हे भाजपचे धोरण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आसाममध्ये बांगला देशातून आलेल्या विशिष्ट घुसखोरांनी तेथील सुपिक जमिनी आणि मालमत्तांवर बेकायदेशीर कबजा केला आहे. भाजप सरकार पुन्हा निवडून आल्यास लव्ह जिहाद आणि लँड जिहाद अशा प्रकारांविरोधात कठोर कारवाई केली जाईल. हे प्रकार रोखण्यासाठी कायदे केले जातील, असे आश्वासन त्यांनी दिले.
घुसखोरीला प्रोत्साहन
एआययुडीएफ हा पक्ष आसाममध्ये घुसखोरीला प्रोत्साहन देत आहे. काँगेसने या पक्षाशी युती केली असून हे दोन्ही पक्ष आसामच्या संस्कृतीला धोका निर्माण करीत आहेत. भाजप कोणत्याही परिस्थितीत या राज्याची संस्कृती आणि लोकसंख्या यांची सुरक्षा करण्यासाठी कटिबद्ध आहे. लोकांनी काँगेसच्या कुटील धोरणांपासून सावध रहावे. भाजप सरकारच्या पाच वर्षांच्या राज्यात दंगेधोपे आणि घुसखोरी यांना आळा घालण्यात यश आलेले आहे. ही प्रक्रिया पुढे सुरू ठेवण्यासाठी लोकांनी पुन्हा भाजप आणि रालोआच्या सरकारला संधी द्यावी असे आवाहन त्यांनी केले.