आताच सुधरा, अन्यथा राम नाम सत्यच्या यात्रेसाठी तयार रहा
वृत्तसंस्था/ जौनपूर
उत्तरप्रदेशात ‘लव्ह जिहाद’च्या वाढत्या प्रकरणांदरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अशा गुन्हय़ात सामील असलेल्यांना निर्वाणीचा इशारा दिला आहे. अशा गुन्हेगारांनी राम नाम सत्यच्या यात्रेसाठी तयार रहावे, त्यांना कुठल्याही स्थितीत मोकळे सोडले जाणार नसल्याचे योगींनी म्हटले आहे.
विवाहासाठी धर्मांतराला मान्यता मिळू नये, असा आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला आहे. याचमुळे लव्ह जिहादला कठोरपणे रोखण्याचे काम सरकार करणार आहे. एक प्रभावी कायदा लागू करण्यात येणार असल्याचे योगींनी सांगितले आहे.
छुप्या वेशात, नाव लपवून जे लोक मुलींच्या अब्रूशी खेळतात, अशा लोकांची राम-नाम सत्यची यात्रा निघणार असल्याचा इशारा देतो. मिशन शक्तीचा कार्यक्रम याचसाठी राबवत आहेत. प्रत्येक माताभगिनीला सुरक्षेची हमी देणे हाच मिशन शक्तीचा उद्देश आहे. तरीही कुणी दुस्साहस केल्यास ऑपरेशन शक्ती तयार आहे. कुठल्याही स्थितीत माताभगिनींची सुरक्षा करणे हाच उद्देश आहे. न्यायालयाच्या आदेशाचे पालन होईल आणि भगिनी-कन्यांचा आदर होणार असल्याचे योगी म्हणाले.
केवळ विवाहासाठी धर्मांतर वैध नसल्याचे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. भिन्न धर्माच्या जोडप्याची याचिका फेटाळत न्यायालयाने संबंधितांना दंडाधिकाऱयांसमोर हजर राहून म्हणणे नोंदविण्याची सूट दिली आहे. एका मुलीने स्वतःच्या वैवाहिक जीवनात कुटुंबीयांना हस्तक्षेप करण्यापासून रोखण्याची मागणी उच्च न्यायालयाकडे केली होती.