तब्बल 8 वर्षांनंतर न्यायालयात आरोपपत्र दाखल
प्रतिनिधी / बेंगळूर
बेंगळूरसह देशातील प्रमुख शहरांमध्ये घातपाताचा कट रचलेल्या लष्कर-ए -तोयबा संघटनेच्या दोन संशयित दहशतवाद्यांविरुद्ध राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. बेंगळूरमधील डॉ. सबील अहमद आणि हैदराबादमधील असाददुल्ला खान उर्फ अबु सुफियान यांच्याविरोधात एनआयए विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
देशभरात विध्वंसक कृत्ये घडवून आणण्याच्या उद्देशाने लष्कर-ए -तोयबा संघटनेच्या या संशयित दहशतवाद्यांनी बेंगळूर, हुबळी, नांदेड, तेलंगण, हैदराबादसह इतर शहरांमधील हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचला होता. यापूर्वी एनआयएने 17 संशयितांना अटक केली होती. त्यापैकी काही जणांविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. याच प्रकरणात 2016 मध्ये न्यायालयाने 13 जणांना पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली होती. उर्वरित पाच जणांविरोधात सुनावणी सुरू आहे.
मात्र, डॉ. सबील अहमद व असाददुल्ला खान यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल झाले नव्हते, तब्बल आठ वर्षांनंतर या दोघांविरुद्ध सोमवारी एनआयएने दोषारोपपत्र दाखल केले. या दोघांनी दहशतवादी कृत्यांसाठी अनेक बैठका घेतल्या होत्या. 20 ऑगस्ट 2012 रोजी त्यांच्याविरोधात बेंगळूरच्या बसवेश्वरनगर पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता.