ऑनलाईन टीम / लडाख :
भारतीय लष्कराच्या इंजिनिअर्सनी रणनितीक दृष्टीने लडाखमधील गलवान नदीवर अत्यंत वेगाने पूल बांधला आहे. 60 मीटर लांबीचा हा पूल 72 तासात उभारण्यात आला असून, या पुलामुळे लष्कराच्या तुकड्यांना वेगात नियंत्रण रेषेजवळ पोहचता येणार आहे.
गलवान खोऱ्यात 15 जूनच्या रात्री भारत आणि चिनी सैनिकांमध्ये हिंसक संघर्ष झाला. मंगळवरीही हा संघर्ष झाला. मात्र, अशा काळातही भारतीय लष्कराने रणनितीक सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असलेल्या या पुलाचे बांधकाम हाती घेतले. गुरुवारी दुपारी हा पूल बांधून पूर्ण झाला. दोन तास या पुलावर वाहनांची चाचणी घेण्यात आली. त्यानंतर या पुलावरून वाहतूक सुरू करण्यात आली.
लष्कराच्या कारु स्थित माऊंटन डिव्हिजनने लष्कराच्या इंजिनिअर्सच्या युनिटला अजिबात विलंब न लावता लवकरात लवकर या पुलाचे बांधकाम पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. या पुलामुळे भारतीय लष्कराची क्षमता वाढणार असल्याने हा पूल उभारायला चीनचा विरोध होता. मात्र, चीनला न जुमानता लष्कराच्या इंजिअर्सनी हा पूल पूर्ण केला.