सर्व मृतदेह ‘लपवण्याचा’ प्रयत्न केला : अहवाल
दिल्ली / प्रतिनिधी
शनिवारी नागालँडच्या मोन जिल्ह्यात गोळीबार करण्यापूर्वी पिकअप ट्रकवर कामावरून परतणाऱ्या नागरिकांची ओळख पटवण्याचा कोणताही प्रयत्न लष्कराने केला नाही, असे राज्याचे पोलिस महासंचालक (डीजीपी) टी. जॉन. लाँगकुमार आणि आयुक्त रोविलातुओ मोर यांनी संयुक्त अहवालात म्हटले आहे.
प्रत्यक्षदर्शींचा हवाला देऊन, दोन उच्च अधिकार्यांनी सांगितले की, लष्कराच्या विशेष दलाने सहा लोकांचे मृतदेह त्यांच्या बेस कॅम्पवर घेऊन जाण्याच्या उद्देशाने पिक-अप व्हॅनमध्ये गुंडाळून आणि लोड करून “लपवण्याचा” प्रयत्न करताना ग्रामस्थांना आढळले.
“4 डिसेंबर रोजी संध्याकाळी सुमारे ८ वाजता, आठ गावकरी तिरू येथे कोळसा खाणकाम करून पिक-अप ट्रकमधून घरी परतत असताना, सुरक्षा दलांनी (असाममधील 21 व्या पॅरा स्पेशल फोर्स) ओळखीचा कोणताही प्रयत्न न करता हल्ला करून त्यांना ठार केले.”असे रविवारी राज्य सरकारला सादर करण्यात आलेल्या अहवालात म्हटले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, बळी पडलेले सर्व निशस्त्र नागरिक कोळसा खाणीत काम करत होते. यामध्ये सहा जण जागीच ठार झाले तर दोघे गंभीर जखमी झाले.