चीन-पाकिस्तानशी एकत्रितरित्या लढा शक्य : वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारतीय लष्कर आता दहा ऐवजी पंधरा दिवसांचा शस्त्रसाठा आणि गोळाबारूदांचा साठा ठेवणार आहे. आतापर्यंत सेनेला फक्त दहा दिवसांचा शस्त्रसाठा ठेवण्याची परवानगी होती. चीनसोबत सीमेवर चालू असलेल्या तणावादरम्यानच भारताने मोठा निर्णय घेतला आहे. या नव्या अधिकारामुळे आणि आपत्कालीन खरेदीचा वापर करून सेना पुढील काही महिन्यात 50 हजार कोटींपेक्षा जास्त किमतीची सामुग्री खरेदी करणार आहे. देशी आणि विदेशी स्रोतांकडून वेगवेगळी सुरक्षा उपकरणे आणि शस्त्रास्त्रे खरेदी करण्यात येणार आहेत. ही चीन आणि पाकिस्तानशी एकाच वेळी लढण्याची तयारी असल्याचे म्हटले जात आहे.
‘शत्रूसोबतच्या 15 दिवसांच्या गंभीर युद्धासाठी आवश्यक ती तयारी करण्यासाठी शस्त्रास्त्रे आणि गोळाबारूद खरेदी करण्यात येत आहेत.’ असे सुरक्षा दलातील सूत्रांकडूनच स्पष्ट करण्यात आले आहे. सुरक्षा दलांसाठी शस्त्रसाठा ठेवण्याची मर्यादा वाढवण्याचा निर्णय काही काळापूर्वी घेतला गेला होता. सेनेला सुरुवातीला 40 दिवसांच्या युद्धासाठी पुरेशी सामग्री ठेवण्याची परवानगी होती, पण युद्धाच्या बदलत्या पद्धती आणि शस्त्रास्त्रांचा साठा करण्यात येणाऱया अडचणी लक्षात घेता ही मर्यादा कमी करून 10 दिवस करण्यात आली होती. मात्र, आता पाकिस्तान आणि चीन या दोन्ही शेजारी राष्ट्रांकडून घातपाती कारवाया होण्याच्या शक्यतेने युद्धसज्ज राहण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
पाकिस्तान-चीनच्या सीमारेषांवर तणाव
भारत सध्या चीनसोबतच्या सीमेवर तणावाचा सामना करत आहे. सोबतच पाकिस्तानशी जोडून असलेल्या सीमांवर घुसखोरीचा प्रयत्नही सातत्याने होत आहे. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत अनेकदा दोन आघाडय़ांवरील युद्धांबद्दल बोलले आहेत. तिन्ही सेनांच्या प्रमुखांनी चीन आणि पाकिस्तानकडून असलेल्या धोक्मयाचा उल्लेख केला आहे.
सुरक्षा दलांच्या खर्च मर्यादेत वाढ
उरी हल्ल्यानंतर युद्धासाठीचा साठा कमी पडत असल्याचे लक्षात आले. तत्कालीन संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वात मंत्रालयाने लष्कर, वायुसेना आणि नौदलाच्या उपप्रमुखांचे आर्थिक बल 100 कोटी रुपयांपासून वाढवून 500 कोटी रुपये करण्यात आले होते. तीन सेनांना 300 कोटी रुपयांची आपत्कालीन आर्थिक ताकदही देण्यात आली असून त्याद्वारे युद्धात उपयोगी पडणारे कोणतेही उपकरण खरेदी करता येणार आहे. चीनसोबतच्या तणावाच्या परिस्थितीत भारताने अनेक सुरक्षा करार केले आहेत. याशिवाय अनेक स्वदेशी संरक्षण आणि प्रक्षेपण यंत्रणांच्या चाचण्याही केल्या आहेत.
‘डीआरडीओ’ची नवी सब-मशीनगन मिनिटात करणार 700 राऊंड फायर
डीआरडीओने विकसीत केलेली 5.56ƒ30 एमएम सब-मशीनगन संरक्षण मंत्रालयाच्या प्रायोगिक परीक्षणात पास झाली आहे. आता या मशीनगनचा लष्करात वापर करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ‘डीआरडीओ’ने विकसीत केलेली ही सब-मशीनगन जॉईंट प्रोटेक्टिव्ह व्हेन्चर कार्बोन गॅस संचलित सेमी ऍटोमॅटिक शस्त्र आहे. यामधून एका मिनिटाला 700 पेक्षा अधिक राऊंड फायर केले जाऊ शकतात. संरक्षण मंत्रालयाच्या अंतिम प्रायोगिक परीक्षणात आवश्यक ती सर्व मानके पूर्ण करण्यात आली आहेत. या मशीनगनचे वजन 3 किलोग्रॅम इतके असून 100 मीटरपर्यंत मारक क्षमता आहे.