मागच्या मंगळवारी मुंबईतील बीकेसी लसीकरण केंद्रांवर ज्येष्ठ नागरिकांची झालेली तुंबळ गर्दी प्रशासनातील व्यवस्थेकडे बोट दाखवणारी होती. लसीकरणासाठी 3 वर्ग प्राधान्याने ठरविण्यात आले. लसीकरणाला 16 जानेवारीपासून सुरुवात झाली असून 2 महिन्यानंतरही या प्रक्रियेतील गोंधळ संपत नसल्याचे चित्र आहे.
दररोज कोरोना रुग्ण वाढीचा वेग वाढत असल्याने कोरोना लाटेच्या भयाने का असेना प्रत्येकाला लसीचे महत्त्व पटले आहे. तरुण वयातील मुले, घरातील कर्ता पुरुष किंवा महिला आणि ठणठणीत असलेले आजी आजोबा अशा वयोगटातील नागरिक मागच्या वर्षाच्या कोरोना संसर्गात गमावले आहेत. जवळच्या नातेवाईकांचे कोरोनाने निधन झाल्याने कोरोनाचा धाक आज सर्वच वयोगटातील नागरिकांमध्ये आहे. मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टंसिंग आदी नियम पाळत असूनही कोरोना प्रतिबंधात्मक लस संजीवनी ठरत असल्याने प्रत्येकाला आज लस हवी आहे.
लसीकरण प्राध्यान्य गटात अर्थात आरोग्य कर्मचारी आणि प्रंट लाईन वर्कर म्हणजे पोलीस, सफाई कर्मचारी येतात. त्यांना प्राथमिकता देण्यात आली. त्यांच्या लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू आहे. आता ज्येष्ठ नागरिक आणि सहव्याधी रुग्ण यांना लसीकरण करण्यात येत आहे. मात्र लसीकरणातील गोंधळ दिवसेंदिवस वाढतच जात असल्याचे समोर येत आहे. लसीकरण प्रक्रियेत गोंधळ असल्याचे कोरोना अभ्यासकांतील तज्ञही दुजोरा देत आहेत. अगदी सुरुवातीपासून लसीकरणाने वेग धरला पाहिजे, वेगवान लसीकरण होत नसल्याचे हे तज्ञ सांगतातही. लसीकरणासाठी तयार केलेल्या कोवीन ऍपमधील त्रुटी आरोग्य कर्मचायांनी सुरुवातीच्या टप्प्यातच ध्यानात आणून दिल्या. शिवाय त्यावेळचे लस लाभार्थी संख्या आणि लसीकरण केंद्रांची संख्या अगदी कमी होती.
लसीकरणच्या सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यात उद्भवलेल्या कोवीन ऍपमधील त्रुटी बऱयापैकी कमी झाल्या असे सांगण्यात आले असले तरी सध्या ज्येष्ठ नागरिकांच्या टप्प्यापर्यंत देखील या ऍपमधील गोंधळ सुरूच होता. मुंबईत 50 लाखांच्या घरात ज्येष्ठ नागरिक असल्याचे सांगण्यात येत आहे. शिवाय 45 वर्षापर्यंत सहाव्याधी असलेले नागरिकही आहेत. या सर्वाना 1 मार्चपासून लस देण्याचे ठरले. असे असले तरी त्यांच्या नोंदीवरून पुन्हा गोंधळ सुरु झाला. त्याची परिणीती सोमवारच्या बीकेसी येथील लसीकरण केंद्रावरील अव्यवस्थेत झाली. या ठिकाणी सकाळच्या सुमारास तास दीड तास हा गोंधळ झाला असताना प्रसारमाध्यमातून कळल्यावर प्रशासनाकडून दाखल घेण्यात आली. मात्र तोपर्यंत लसीकरणाबाबतचा नकारात्मक संदेश मुंबईभर पोहचला होता.
आजही ज्येष्ठ नागरिकांमधील कित्येक जण लसीकरण माहितीबाबत संभ्रमावस्थेत आहेत. तत्पूर्वी केंद्रावर येणाऱया व्यक्तीला लस असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. त्याप्रमाणे ज्येष्ठ लाभार्थी केंद्रावर पोचले. मात्र दुसऱया लसीची माहिती कधी आणि कुठे मिळणार हे प्रश्न घेऊनच ते घरी परतले होते. आज मुंबईतील काही ज्येष्ठ नागरिक असहाय्य्य अवस्थेत राहत आहेत तर कित्येक जणांना अक्षर ओळखही नाही अशांपर्यंत लसीकरण माहिती कशी पोचणार हा प्रश्न निरुत्तर करणारा आहे. लसीकरणाबाबत जागरूकता करण्यास प्रशासन उणे पडत असल्याने ही संभ्रमावस्था कायम आहे. अर्थात राज्य सरकार आणि पालिका प्रशासनाकडून लसीकरणातील त्रुटी काढण्याच्या प्रयत्न केला जात आहे. जसे सुरुवातीला दहाच लसीकरण केंद्रे होती. या केंद्रांवर आरोग्य कर्मचारी आणि प्रंट लाईन वर्कर यांनी लस घेतली. मात्र लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु करण्यासाठी केंद्रे वाढविण्यात आली. ज्येष्ठ नागरिक आणि सहव्याधी लाभार्थीना लसीकरण करण्याचा अभ्यास झाल्यावर सध्या सुमारे 60 लसीकरण केंद्रे मुंबईत आहेत. लसीकरण केंद्रांची संख्या वाढवणे आवश्यक असल्याने शिवाय खासगी हॉस्पिटलांनादेखील लसीकरणात सहभागी करून घेतले आहे. अजूनही केंद्रे वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. केंद्र वाढल्याने गर्दीचे व्यवस्थापन करण्यास नक्की मदत होईल. मात्र आजही नोंदणीबाबत स्पष्टता नसल्याने इच्छा असूनही लाभार्थी गोंधळात आहेत. नोंदणी प्रक्रियेत सुलभता वाटत नसल्यास लाभार्थींच्या वतीने कोणीही कुठूनही नोंदणी करण्याची मुभा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. ज्यांना समजत नसल्यास जाणकारांच्या मदतीने नोंदणी करण्यास सुचविले आहे. यासाठी प्रशासनाने दोन संकेत स्थळे दिली आहेत.
या नोंदणीत मोबाइल नंबरवर आलेल्या ओटीपी नंबरच्या नोंदीने लाभार्थीची पडताळणी केली जाते आहे. या पडताळणीत आधारकार्ड, निवडणूक ओळखपत्र, किंवा वाहन परवाना, पॅनकार्डसारख्या ओळखपत्राची तपासणी केली जात आहे. यानंतरच्या प्रक्रियेत लाभार्थीचे नाव आणि लस घ्यावयाची ठिकाण कर्मचारी आणि वेळ अशी माहिती प्राप्त होते. अशी सुलभ पद्धत प्रशासनाने ठेवली असली तरीही कित्येक लाभार्थीना मोबाइलची माहिती नाही तर कित्येकांकडे मोबाईल नसल्याने त्यांनी काय करावे अशा पर्यायाबाबत ते साशंक आहेत.
राज्यात रविवारपर्यंत 17,44,724 जणांना लसीकरण करण्यात आले तर मुंबईत 3 लाख 50 हजार लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले असले तरी लसीकरण लाभार्थ्यांची संख्या कमी असल्याचे कोरोना निरीक्षण समितीतील तज्ञ सांगत आहेत. लसीकरणाबाबतचा गैरसमज दूर करून लाभार्थ्यांची संख्या वाढविणे आवश्यक असल्याची सूचना हे तज्ञ वारंवार करत आहेत. कोवीन ऍपबाबत मुंबईतील वैद्यकीय अधिकारी खासगीत नाराजी व्यक्त करतात. तर त्या ऍपची हाताळणी आणि त्यानंतर येणारा प्रतिसाद संथ गतीचा असल्याचे या नाराजी मागील कारण आहे. या तुलनेत आवश्यक त्या कागदपत्रांची पडताळणी करून केंद्रांवर लस दिल्यास अधिक सयुक्तिक ठरेल असेही काही जण मत व्यक्त करत आहेत. मात्र लसीकरण लाभार्थींच्या लसीकरण नोंदीची माहिती नमूद होणे आवश्यक असल्याने ऍपचा खटाटोप सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. लसीकरण नोंदीत हे प्रश्न उद्भवत असताना मात्र कित्येक लाभार्थी कोव्हीशील्ड की को-वॅक्सीन लस घ्यावी याबाबतही द्विधा अवस्थेत आहेत. मात्र दोन्ही लसी सुरक्षित असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. मुंबईतील काही केंद्रामधून कोव्हिशिल्ड तर काही ठिकाणी को-वॅक्सीन लस दिली जात आहे. राज्य सरकारच्या जे.जे. रुग्णालयात तर दोन्ही लशी दिल्या जात आहेत.
राम खांदारे