प्रतिनिधी/ रत्नागिरी
कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्र देशातील अग्रणी राज्य ठरले आहे. मात्र कोकण पट्टय़ातील 5 जिल्हय़ामध्ये रत्नागिरी चौथ्या तर सिंधुदुर्ग पाचव्या स्थानावर आहे. रत्नागिरी जिल्ह्य़ात आतापर्यंत 2 लाख 27 हजार 985 तर सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात 1 लाख 68 हजार 603 नागरिकांचे लसीकरण मंगळवारी पूर्ण झाले आहे. यामध्ये ठाणे, रायगडसह पालघर जिल्हा आघाडीवर आहे.
कोरोना लसीकरणात महाराष्ट्राने सोमवारी 2 कोटीचा टप्पा ओलांडला. एवढय़ा मोठय़ा संख्येच्या लसीकरण करणारे महाराष्ट्र देशातील अव्वल राज्य ठरले आहे. या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य यंत्रणेचे अभिनंदन केले आहे. मंगळवारी 18 मे रोजी पर्यंत राज्यात सुमारे 2 कोटी 23 लाख नागरिकांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
रत्नागिरी जिल्ह्य़ात 18 मे पर्यंत आरोग्य कर्मचाऱयांना 17 हजार 458 पहिले तर 11 हजार 765 दुसरे डोस देण्यात आले. फ्रन्टलाईन वर्कर्समध्ये 30 हजार 5 पहिले तर 13 हजार 385 दुसरे डोस देण्यात आले आहेत. 18 ते 44 वर्षे वयोगटात 26 हजार 33 पहिले डोस देण्यात आले. 45 वर्षांवरील वयोगटात 1 लाख 6हजार 67 पहिले तर 23 हजार 274 दुसरे डोस देण्यात आले. आतापर्यंत रत्नागिरी जिल्हय़ात एकूण 2 लाख 27 हजार 985 जणांनी लसीकरणाचा लाभ घेतला आहे.
सिंधुदूर्ग जिल्हय़ात आरोग्य कर्मचाऱयांना 9 हजार 524 पहिला तर 6 हजार 509 जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. फ्रन्टलाईन वर्कर्समध्ये पहिला डोस 7 हजार 823 तर दुसरा डोस 3 हजार 910 जणांना देण्यात आला आहे. 18 ते 44 वर्षे वयोगटात पहिला डोस 12 हजार 452 जणांना देण्यात आला आहे. 45 वर्षांवरील वयोगटात पहिला डोस 1 लाख 4,617 तर दुसरा डोस 23 हजार 768 जणांना देण्यात आला आहे.