केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी केले देशवासियांना आवाहन
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून केलेल्या चर्चेवेळी संथगतीने चाललेल्या लसीकरणाबाबत चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर आता केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी लोकसभेत बोलताना देशातील लसीकरणाविषयी माहिती दिली. तसेच, कुणीही लसीकरणाविषयी मनात शंका ठेवू नका, असे आवाहनही त्यांनी देशवासियांना केले. ‘देशात दिल्या जाणाऱया कोविड-19 लसींबाबत कुणाच्याही मनात संशय असू नये. सगळय़ांनी कोरोनाची लस घ्यायला हवी, अशी माझी विनंती आहे’, असे डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटले आहे.
कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेसंबंधी सरकारकडून वारंवार माहिती आणि आवाहन केले जात असून देखील अनेक नागरिकांच्या मनात लसीकरणाविषयी अजूनही शंका आहेत. या शंका दूर करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आरोग्यमंत्र्यांनी केला आहे. केंद्रीय आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत 3 कोटी 39 लाख लाभार्थींना कोरोनाची लस देण्यात आली आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात कोरोनायोद्धे, डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, पोलीस, पंतप्रधान, राज्यांचे मुख्यमंत्री, 60 वर्षांवरील ज्ये÷ नागरिक आणि 45 वर्षांवरील सहव्याधीग्रस्त नागरिक यांचा समावेश आहे.
लसी वाया न घालवण्याची सूचना
लसीबाबत असलेल्या संशयामुळे आणि हाताळण्याच्या अपुऱया ज्ञानामुळे लसीचे डोस वाया जाण्याचे प्रमाण देखील वाढल्याचे दिसून आले आहे. लसीकरणाविषयी अपुरे प्रशिक्षण आणि लसीकरणाच्या ठिकाणी नियोजनाचा अभाव या दोन प्रमुख गोष्टी लसी वाया जाण्याला कारणीभूत ठरल्या आहेत. या त्रुटी दूर करण्याची आवश्यकताही आरोग्यमंत्र्यांनी अधोरेखित केली आहे.