पाच पालिका परिसरातील प्रकार : असंख्य ज्येष्ठ नागरिकांना जावे लागले परत
प्रतिनिधी / पणजी
सरकारला लसीकरणापेक्षा निवडणूक महत्वाची वाटली आणि आचारसंहितेचे कारण देऊन लसीकरण थांबविण्यात आले. त्याचा फटका गुरूवारी अनेक ज्येष्ठ नागरिकांना बसला व लस न घेताच घरी परतावे लागले, अशी तक्रार काँग्रेसच्या महिला अध्यक्ष बिना नाईक यांनी केली आहे. लोकांचा जीव महत्वाचा, लोक जिवंत राहिले तरच मतदान करतील, त्यामुळे सरकारने मतदानापेक्षा लोक जिवंत राहावे यासाठी प्रयत्न करायला हवे होते, असे नाईक पुढे म्हणाल्या.
राज्यातील पाच पालिकांच्या निवडणूक आचारसंहितेमुळे गुरुवारी अनेक पालिका परिसरात लसीकरण मोहीम थांबविण्यात आली होती. मोतीदोंगर मडगाव येथील टीबी इस्पितळात आलेल्या शेकडो नागरिकांना त्यामुळे विना लस परत जावे लागले. त्याबद्दल सर्व नागरिकांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. कोविड लस आणि निवडणूक यांचा काय संबंध, असा सवाल अनेकांनी उपस्थित केला. या सरकारला लसीकरणापेक्षा निवडणूक जास्त महत्वाची वाटते का? असा सवाल उपस्थित करताना, त्यापेक्षा निवडणूक रद्द करायला हवी होती, अशी प्रतिक्रिया एका ज्येष्ठ नागरिकाने व्यक्त केली.
दरम्यान, सदर प्रकार लक्षात आल्यानंतर काँग्रेस महिला अध्यक्ष बिना नाईक यांनी त्वरित आरोग्य अधिकारी आणि जिल्हाधिकाऱयांना फोनवरून माहिती दिली. तेथे त्यांना आचारसंहितेमुळे लसीकरण थांबविण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यासंदर्भात आम्ही निवडणूक आयोगाकडे पत्रव्यवहार केला असून त्यांच्याकडून सकारात्मक आदेश मिळाल्यास आम्ही लसीकरण करू, असेही सांगण्यात आले.
आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने दि. 21 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंतच लसीकरण चालू ठेवण्यास मान्यता दिली होती. मात्र त्यानंतर गोवा सरकार आणि आरोग्य संचालनालयाकडून विनंती करण्यात आल्यामुळे आयोगाने दुपारी नव्याने आदेश जारी करून लसीकरण चालू ठेवण्यास मान्यता दिली.
मात्र या मोहिमेवर आयोगाचे कठोर लक्ष असेल, मोहिमेदरम्यान कोणत्याही राजकीय पक्षाचा हस्तक्षेप खपवून घेण्यात येणार नाही. कोणतीही राजकीय व्यक्ती, नेता यांचे छायाचित्र असलेले पोस्टर्स, बॅनर्स लसीकरण केंद्रांच्या परिसरात लावता येणार नाहीत, असे आदेशात बजावले आहे. दोन्ही जिल्हाधिकारी, निवडणूक अधिकारी, निर्वाचन अधिकारी आणि निवडणूक निरीक्षक यांना या मोहिमेवर लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.