केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घोषणा
ठाकूरनगर / वृत्तसंस्था
सध्या सुरू असलेली कोरोना लसीकरण मोहीम संपताच देशात नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) लागू केला जाणार असल्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पश्चिम बंगालमधील ठाकूरनगर येथे आयोजित सभेमध्ये केली आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्यांतर्गत निर्वासितांना नागरिकत्व दिले जाणार असून पश्चिम बंगालमधील अनेकांना याचा लाभ होणार असल्याचा दावाही त्यांनी केला. तसेच पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर केंद्र सरकार येथे ‘शरणार्थी कल्याण योजना’ राबवणार असल्याचे ते पुढे म्हणाले.
केंद्रातील मोदी सरकारच्या कार्यकाळात 2018 मध्ये आम्ही सर्वांसाठी सीएए कायदा आणण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार 2019 मध्ये यासंबंधीच्या कायद्याला मंजुरी देण्यात आली. मात्र, 2020 मध्ये देशात आलेल्या कोरोना विषाणू संसर्गामुळे या कायद्याची अंमलबजावणी होऊ शकली नव्हती. आता कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम पूर्ण झाल्यानंतर हा कायदा लागू केला जाणार असल्याचे शहा यांनी सांगितले. ममता बॅनर्जी यांनी आपण सीएएला राज्यात परवानगी देणार नाही असे म्हटले होते. पण, आम्ही जे आश्वासन देतो ते पूर्ण करतो. कोरोना लसीकरण आणि महामारी संपताच आम्ही सीएए लागू करणार असल्याचे अमित शहा यांनी सांगितले.
‘सीएए’ कायद्यानुसार पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या देशांतून 31 डिसेंबर 2014 पर्यंत भारतात आलेल्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी व ख्रिस्ती समुदायाच्या लोकांना बेकायदा स्थलांतरित मानले जाणार नाही. तसेच त्यांना भारतीय नागरिकत्व दिले जाईल, अशी तरतूद सुधारित नागरिकत्व कायद्यात करण्यात आली आहे.