जिल्हाधिकाऱयांसोबतच्या बैठकीत पंतप्रधानांची सूचना :
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पंतप्रधानांनी गुरुवारी दहा राज्यातील 54 जिल्हाधिकाऱयांसोबत कोरोना परिस्थितीबाबत चर्चा केली. यावेळी कोरोना प्रतिबंधक लसीचा एकही डोस वाया घालवू नका, अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. तसेच लसींचा पुरवठा आणि स्थानिक पातळीवरील स्थिती पाहून परिस्थितीनुरुप योग्य निर्णय घेण्याचा सल्लाही त्यांनी दिला. यावेळी पंतप्रधानांनी जिल्हाधिकाऱयांना कोविड संसर्गाची माहिती आणि त्यांच्या संबंधित जिह्यातील तरुण तसेच मुलांमधील गांभीर्य याविषयी माहिती एकत्रित करण्यास सांगितले आहे.
लसीचा एक डोस वाया जाणे म्हणजे एखाद्याला आजारापासून संरक्षण नाकारल्यासारखे असल्याचा दावा पंतप्रधानांनी आपल्या संवादामध्ये केला. पंतप्रधानांच्या सूचनांना अनुसरून जिल्हाधिकाऱयांनी आपल्या जिल्हय़ातील कोरोनास्थिती आणि खबरदारीची माहितीही दिली. या चर्चेत महाराष्ट्रातील 17 जिल्हाधिकारी सहभागी झाले होते. तसेच मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्रीही या ‘व्हर्च्युअल’ बैठकीला उपस्थित होते. पंतप्रधान मोंदींनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे महाराष्ट्र, छत्तिसगड, हरियाणा, केरळ, ओडिशा, पुदुच्चेरी, राजस्थान, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि आंध्रप्रदेश या राज्यांमधील जिल्हाधिकाऱयांशी आणि काही अधिकाऱयांशी संवाद साधला. या दरम्यान या राज्यांचे मुख्यमंत्री देखील या ऑनलाईन चर्चेत सहभागी झाले होते.
कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर पंतप्रधानांनी जिल्हाधिकाऱयांना काही सूचनाही केल्या. कोरोनाचा विषाणू अदृश्य असून त्याचे विविध स्ट्रेन पुढे येत आहेत. या स्ट्रेनप्रमाणेच आपला दृष्टीकोन सातत्याने गतिशील आणि सुधारित असायला हवा, असे पंतप्रधान म्हणाले. कोरोना विषाणूच्या म्युटेशनमुळे तरुण, लहान मुलांबद्दल अधिक चिंता निर्माण झाली आहे. त्यामुळे आपण त्याच्याविरोधात लढण्यासाठी सतत सज्ज असायला हवे, असेही त्यांनी सांगितले.
ग्रामीण भागात जागृती आवश्यक
देशाच्या ग्रामीण भागातही आता कोरोना विषाणूचा शिरकाव वाढला असून वेगवेगळय़ा ठिकाणच्या परिस्थितीला अनुसरून स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याची अपेक्षा त्यांनी क्यक्त केली. तसेच ग्रामीण भागातील संसर्ग रोखण्यासाठी लोकांमध्ये जागृती करण्याचा सल्लाही दिला. कोरोनाविषयक माहिती आणि दक्षतेच्या बाबतीतही सर्वांनी सतर्कता बाळगली पाहिजे, अशी सूचनाही पंतप्रधानांनी जिल्हाधिकाऱयांना केली. लोकांमध्ये कोरोना संसर्गाची लक्षणे आढळून आल्यास त्यांना तातडीने वैद्यकीय सल्ला आणि कोरोना चाचणी करण्यास बजावले पाहिजे. तसेच गावांमध्ये जागृती वाढविण्यावर भर देण्यात यावा, असेही पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधान मोदींवर ममता बॅनर्जी संतप्त
“…जर राज्यांना बोलण्यास परवानगी नव्हती तर बैठकीला बोलावलात तरी कशाला?”
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी पंतप्रधान मोदींच्या दहा राज्यांमधील जिल्हाधिकाऱयांशी झालेल्या चर्चेत, मुख्यमंत्र्यांना बोलण्यास परवानगी देण्यात आली नसल्याचा आरोप करत संताप व्यक्त केला आहे. “…जर राज्यांना बोलण्याची परवानगी नव्हती तर त्यांना का बोलावण्यात आलं? असा प्रश्न उपस्थित करत बोलण्यास परवानगी देण्यात न आल्याबद्दल सर्व मुख्यमंत्र्यांनी निषेध नोंदवायला हवा, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या. व्हर्च्युअल बैठकीत मुख्यमंत्र्यांना केवळ बाहुले बनवून ठेवण्यात आले होते. बोलूच दिले नाही असा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बैठकीनंतरच्या पत्रकार परिषदेत केला. केवळ भाजपचे काही मुख्यमंत्री आणि पंतप्रधानच बोलले. कुठल्याच सूचना मांडण्याची संधी इतर कुणाला देण्यात आली नाही, असे त्या म्हणाल्या. पंतप्रधानांनी या बैठकीत कोरोना लसीची उपलब्धता, राज्यांना होणारा पुरवठा, म्युकरमायकोसिससारख्या नव्या आजाराचा धोका या कुठल्याच गंभीर मुद्दय़ावर चर्चा न केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.