-मागणी 2 लाख 80 हजार, पुरवठा 97 हजार लसींचा, -कोविड लसीची टंचाई, नागरीकांची गैरसोय
कृष्णात चौगले/कोल्हापूर
जिह्यात कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ होत असल्यामुळे नागरीकांचा कोविड लस घेण्याकडे कल वाढला आहे. सद्यस्थितीत कोल्हापूर जिल्हा लसीकरणामध्ये राज्यात आघाडीवर आहे. पण गेल्या आठवडÎाभरात लसीच्या मागणीनुसार पुरवठा झाला नसल्यामुळे नागरीकांना लसीकरण केंद्रांवर तासन्तास रांगेत उभा राहून लस न घेताच घरी परतावे लागत आहे. गेल्या आठवडÎाभरात जिल्हा प्रशासनाकडून 2 लाख 80 लसींची मागणी केली होती. पण केवळ 97 हजार लसींचा पुरवठा झाला आहे. त्यामुळे लसीचा दुष्काळ असताना पंतप्रधानांच्या आवाहनानुसार लसोत्सव साजरा कसा होणार ? असा प्रश्न आरोग्य यंत्रणेसमोर निर्माण झाला आहे.
कोरोनाविरोधात लढण्यासाठी लस घेणे अत्यावश्यक असून ती पूर्णपणे सुरक्षित असल्याची नागरीकांची खात्री होत आहे. गेल्या आठवडÎात आरोग्य विभागाकडून 2 लाख 80 हजार लसींची मागणी केली आहे. पण शासनाकडून पहिल्या टप्प्यात 75 हजार तर दुसऱया टप्प्यात 22 हजार अशी एकूण 97 हजार लस उपलब्ध केली आहे. मागणीच्या तुलनेत तब्बल 1 लाख 77 हजार लसींचा कमी प्रमाणात पुरवठा झाला आहे. त्यामुळे प्रत्येक लसीकरण केंद्रावर दररोज सुमारे 150 ते 200 लस येते. त्या तुलनेत 350 ते 400 नागरीक लस घेण्यासाठी रांगेत उभा असतात. परिणामी रांगेत उभा असलेल्या शेकडो नागरीकांना लसीशिवाय परतावे लागत आहे.
7 लाख नागरीकांनी घेतली लस
जिह्यात प्राथमिक आरोग्य केंद्रे व शासकीय रुग्णालयांमध्ये 232, कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात 12 तर खासगी रुग्णालयांमध्ये 39 लसीकरण केंद्रे आहेत. लसीकरण मोहिम सुरु झाल्यापासून वय वर्ष 45 च्या पुढील नागरीकांना लस दिली जात आहे. या वयोगटातील 15 लाख 91 हजार 449 नागरीकांना लस देण्याचे उद्दीष्ट आहे. त्यानुसार जिह्यातील 7 लाख 1 हजार 334 नागरीकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला. तर 55 हजार 509 नागरीकांनी दुसरा डोस घेतला आहे.
18 ते 45 वयोगटातील नागरीकांच्या लसीकरणाचा आराखडा तयार
जिह्यात 18 ते 45 वयोगटातील 18 लाख 52 हजार 339 नागरीक आहेत. शासन निर्देशानुसार या सर्वांना 1 मे पासून लस दिली जाणार आहे. त्याबाबत जि.प.च्या आरोग्य विभागाने लोकसंख्येनुसार आराखडा तयार केला असून पुरेशी यंत्रणा सज्ज केली आहे. पण 45 वयोगटापुढील नागरीकांनाच लस मिळत नसेल तर 18 ते 45 वयोगटातील लोकांना कशी उपलब्ध होणार, असा प्रश्न आरोग्य विभागासमोर निर्माण झाला आहे.
आरोग्य यंत्रणा सक्षम, पण लसीची टंचाई
कोविड लसीकरणासाठी जिल्हा परिषदेसह महानगरापलिका, नगरपालिका क्षेत्रात आरोग्य यंत्रणा सक्षम आहे. पण शासनाकडून लस उपलब्ध होत नसल्यामुळे नागरीकांची गैरसोय होत आहे. शासन निर्देशानुसार 1 मे पासून 18 ते 45 वयोगटातील नागरीकांना लस दिली जाणार असल्यामुळे लसीच्या मागणीत मोठी वाढ होणार आहे. आगामी काळात पुरेशी लस उपलब्ध झाल्यास लसीकरणाचा वेग आणखी वाढणार आहे. – डॉ. योगेश साळे, जिल्हा आरोग्य अधिकारी,जि.प.कोल्हापूर