- तीन महिन्यात दिल्लीकरांचे लसीकरण पूर्ण करणार
ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. या महामारीला रोखण्यासाठी देशात मोठ्या प्रमाणत लसीकरण मोहीम सुरू आहे. असे असले तरी देशात मोठ्या प्रमाणात लसीचा तुटवडा जाणवत आहे. दिल्लीत देखील हीच परिस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देशात युद्धपातळीवर लस तयार करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.
केजरीवाल यांनी मंगळवारी डिजिटल पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. पुढे ते म्हणाले, सध्या दिल्लीत आम्ही दररोज सव्वा लाख डोस देत आहोत, हे 3 लाख डोस रोज करण्याचे आमचे लक्ष्य आहे. परंतु एक मोठी समस्या समोर येत आहे, ती म्हणजे लस. आमच्याकडे फक्त काही दिवस पुरेल ऐवढीच लस शिल्लक आहे आणि ही समस्या देशभर आहे.
सद्य स्थितीत कोरोनाविरुद्ध लसीकरण मोहिमेला वेग देण्यासाठी युद्धपातळीवर लस तयार करण्याची गरज आहे. सध्या लस तयार करण्याचे काम फक्त दोन कंपन्यांकडे आहे, ते वाढवून अनेक कंपन्यांकडे दिले पाहिजे. लस बनवत असलेल्या दोन कंपन्यांकडून फॉर्म्युला घेऊन तो इतर कंपन्यांना द्या, अशी सूचना देखील त्यांनी यावेळी केली.
यासंदर्भात केजरीवाल यांनी एक उदाहरण देखील दिले आहे. जेव्हा भारतात कोरोना आला होता. तेव्हा पीपीई किटची कमतरता होती. मात्र त्यावेळी इतर कंपन्यानी पीपीई किट बनवण्यात सहभाग घेतला. त्यानंतर कमतरता जाणवली नाही. तसेच लस उत्पादक कंपन्यांच्या उत्पादनाचा एक भाग इतर कंपन्यांना रॉयल्टी म्हणून देता येईल, असे केजरीवाल म्हणाले.