आपल्या देशात कशाचेही राजकारण त्वरित करण्याची पद्धती आहे. विशेषतः ज्यांच्या हातून सत्ता निसटलेली असते आणि ती परत मिळविण्यासाठी जे हपापलेले असतात, त्यांचा असे राजकारण करण्यात पुढाकार असतो. गेले काही महिने कोरोनासारख्या, ज्यावर उपचार नाही, अशा विषाणूमुळे जगाबरोबरच आपला देशही संकटात सापडला आहे. गेल्या अडीच तीन महिन्यांमध्ये परिस्थितीत सुधारणा होऊन उपचाराधीन रुग्णांची संख्या कमी होत आहे. याबरोबरच अनेक लसीही उपलब्ध होत आहेत. यापैकी कोव्हॅक्सिन या भारतनिर्मित तर कोव्हीशिल्ड या ब्रिटन निर्मित लसीच्या आणीबाणीच्या परिस्थितीत उपयोगाला केंद्र सरकार व औषध नियंत्रण प्राधिकारणाने मान्यता दिली आहे. त्यामुळे व्यापक प्रमाणात लसीकरण कार्यक्रम लवकरच् ा केंद्र सरकारकडून, राज्य सरकारांच्या सहकार्याने, हाती घेण्यात येईल अशी शक्यता आहे. वास्तविक हे सर्व भारतीयांसाठी (विरोधी पक्षांसह) अत्यंत आनंददायक वृत्त ठरावयास हवे होते. तथापि, देशासाठी अत्यावश्यक असणाऱया या लसीकरणाच्या कार्यक्रमाला मोडता घालण्याचे हीन राजकारण काही विरोधी पक्ष करीत आहेत. या त्यांच्या प्रयत्नांची निंदा करावी तितकी थोडीच होईल. उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाचे नेते ही लस ‘भारतीय जनता पक्षाची’ असल्याने ती आपण टोचून घेणार नाही असे निषेधार्ह वक्तव्य नुकतेच केले. ‘या लसीचा दुरुपयोग भाजप व केंद्र सरकारकडून विरोधी पक्षांच्या नेत्याविरोधात होऊ शकतो, असे सर्व सभ्य संकेतांचा कडेलोट करणारे विधान काँगेस नेते राशीद अल्वी यांनी करत यादव यांच्या सुरात सूर मिसळला. तर समाजवादी पक्षाच्याच आशुतोष सिन्हा या आणखी एका नेत्याने ही लस माणसाला नपुंसक करू शकते, असाही अजब आरोप केला. हा आरोप भारतीय औषध नियंत्रक महाधिकाऱयांनी लगोलग फेटाळला. तरीही तो केला जात आहेच. शास्त्रज्ञ, डॉक्टर्स, तंत्रज्ञ आणि संशोधकानी रात्रंदिवस कष्ट करून लसी निर्माण केल्या. त्यांचे असंख्य प्रयोग प्राण्यांवर आणि नंतर माणसांवर करण्यात आले. या सर्व दिव्यांमधून तावून सुलाखून ज्या लसी बाहेर पडल्या त्यांनाच, अत्यंत दक्षतापूर्वक विचार करून आणि त्यांच्या संबंधांतील सर्व अहवालांचा सांगोपांग व विस्तृत अभ्यास करूनच या लसींना भारताने तसेच इतर देशांनीही मान्यता दिली. त्यानंतरच देशव्यापी लसीकरणाचा कार्यक्रम हाती घेण्याची योजना भारतासह विविध देशांनी बनविली आहे. या साऱया प्रक्रियेचा कोणत्याही राजकीय पक्षाशी काय संबंध असतो? पण सत्ता गेल्याने व्याकुळ झालेल्या आणि काकुळतीला आलेल्या काही विरोधी पक्षांना याचे भान राहिलेले नाही. प्रत्येक घडामोडीला राजकीय वळण देण्याच्या नादात आपण आपलेच हसे आणि आपलीच राजकीय कोंडीही करून घेत आहोत, हे जाणण्याचीही कुवत त्यांनी गमावली आहे असे दिसते. आज जनतेला लस हवी आहे. ती जनतेला पुरविण्याचे संबंधित सरकारांचे उत्तरदायित्व आहे. भारत सरकारने हे उत्तरदायित्व पार पाडण्याच्या दिशेने पावले टाकली असताना सरकारला सहकार्य करणे हे खरेतर विरोधी पक्षांचे काम आहे. त्यांनी ते न केल्यास ते जनतेच्या मनातून आणखी उतरणार हे निश्चित आहे. पण विशिष्ट नेता, विशिष्ट विचारसरणी आणि विशिष्ट राजकीय पक्ष यांचा सदासर्वकाळ विद्वेष करणे हेच ज्या पक्षांचे धोरण आहे, ते, अशा कृतीचा स्वतःवरही काय परिणाम होईल याचीही तमा बाळगत नाहीत, याचे सखेद आश्चर्य वाटल्यावाचून रहात नाही. मात्र हे केवळ राजकारण आहे असे समजणेही भाबडेपणाचे ठरेल. त्यामागे निश्चित योजनाही असू शकते. जनतेच्या मनात लसीकरणाविषयी शंका निर्माण करणे, तसेच ही लस टोचून घ्यायची की नाही, असा भ्रम जनतेच्या मनात निर्माण करणे आणि सरकारचा लसीकरणाचा कार्यक्रम हाणून पाडण्याचा प्रयत्न करणे यासाठी चाललेली ही धडपड आहे की काय अशी शंका येते. वास्तविक भारतात अनेक प्रकारच्या लसी दरवर्षी नवजात बालकांना टोचल्या अगर पाजल्या जातात. या लसीकरणामुळेच देवीसारख्या जीव घेणाऱया किंवा कायमचे विद्रूप करणाऱया रोगांपासून भारत वाचला आहे. आतापर्यंत भारतात आलेल्या प्रत्येक सरकारच्या काळात (काँगेसपासून भाजपपर्यंत) हे लसीकरण झाले आहे. तसेच प्रत्येक सरकारच्या काळात त्यावेळी विरोधात असणाऱया पक्षांच्या नेत्यांनी त्यांच्या मुलांना या लसी दिल्या आहेत. आवश्यकता भासल्यास स्वतःला टोचून घेतल्या आहेत. पण ‘ही सत्ताधारी पक्षाची लस आहे आणि म्हणून ती मी टोचून घेणार नाही,’ असली हास्यास्पद आणि बिनडोक विधाने आतापर्यंत कोणत्याही पक्षाच्या नेत्यांनी केल्याचे ऐकिवात नाही. पण सध्या तोही अनुभव भारतीय जनता घेत आहे, हे जनतेचे दुर्दैवच म्हणावे लागेल. पण हे दुर्दैव जनतेच्या माथी मारणाऱया पक्षांचे राजकीय भवितव्य याच जनतेच्या हाती आहे, हे ओळखण्याइतका ‘कॉमन सेन्स’ अशा पक्षांनी दाखवावयास काहीच हरकत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात होणार असलेला हा लसीकरण कार्यक्रम यशस्वी झाला तर त्याचे श्रेय त्यांना मिळेल आणि मग आपले काय होणार, ही भीती कदाचित अशा विरोधी पक्षांना सतावत असावी. मात्र, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी लसीकरणाची आवश्यकता ओळखून त्याचे समर्थन केले आहे, ही बाब अभिनंदनीय आहे. लसीकरण हा साऱया देशाच्या केवळ आरोग्याचा आणि जिव्हाळय़ाचाच प्रश्न नाही तर भवितव्याचाही आहे. त्याकडेही क्षुद्र आणि अतिसंकुचित राजकीय दृष्टिकोनातून पाहणे, हे बौद्धिक दिवाळखोरीचेच लक्षण मानले पाहिजे. अर्थात, या जनतेने तिचा सुज्ञपणा अनेकदा दाखवून दिला असल्याने अशा भ्रमयुक्त राजकारणात ती स्वतःचा बळी जाऊ देणार नाही, एवढे निश्चित मानता येते.
Previous Articleनव्या वर्षाचे संकल्प
Next Article मडगावच्या मध्यवर्ती भागाला कचऱयामुळे बकाल स्वरूप
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.