वडूज / प्रतिनिधी :
खटाव तालुक्यातील मुख्यालय असलेल्या वडुजची लोकसंख्या 30 हजारांच्या आसपास आहे. सध्या शहरात अगदी धीम्या गतीने लसीकरण सुरु आहे. चार दिवसातून एकदा फक्त 80 ते 100 डोस येत आहेत. तर लस घेण्यासाठी तालुक्यातील चार पाचशे लोक गर्दी करतात, त्यामुळे लसीकरणाच्या दिवशी उपस्थित असणाऱ्या काही लोकांचे समाधान होते. तर 70 टक्के लोकांना रिकाम्या हाताने परत जावे लागत आहे. याबाबत प्रशासनाने तातडीने लक्ष घालून लसीचे डोस वाढवावेत अन्यथा येत्या चार-पाच दिवसात तहसीलदार कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन करणार असल्याचा इशारा भाजप नगरसेवक अनिल माळी यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
याबाबत निवेदनातील अधिक माहिती अशी की, वडूज सारख्या तालुक्याच्या ठिकाणी दररोज जवळपास 500 डोस देणे गरजेचे आहे. यामध्ये पहिला डोस घेतलेल्या 1500 लोकांना 85 दिवस उलटून गेले असून सुद्धा दूसरा ढोसमिळत नाही. तसेच पहिला ढोस रजिस्ट्रेशन करणाऱ्यांची संख्याही हजारांच्या घरात आहे. जिल्ह्याच्या ठिकाणाहून नियोजन करणारे अधिकारी जाणूनबुजून कोणताही निकस न लावता वडुजला कमी प्रमाणात डोस उपलब्धकरून देत आहेत. त्यामुळे वृद्ध व अपंग लोकांना महिनाभर हेलपाटे मारावे लागत आहेत. तरी प्रशासनाने याबाबत तातडीनेलक्ष घालून लसीकरण केंद्र तसेच लसीकरणाला येणाऱ्याची संख्या विचारात घेवून वडूजसारख्या ठिकाणी आरोग्य कॅम्प लावून जास्तीत जास्त लस देण्याचे प्रयत्न करावेत. अन्यथा येत्या चार ते पाच दिवसात तहसीलदार कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.यावेळी मा. उपसरपंच शशिकांत पाटोळे, नियोजन सभापती प्रदीप खुडे,सोमनाथ जाधव, संजय काळे आदी उपस्थित होते.