नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम जोरात सुरू असतानाच विविध अफवाही पसरवल्या जात आहेत. अशा अफवांमुळे लोकांमध्ये लसीविषयी भीती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाल्याने केंद्रीय गृह मंत्रालयाने राज्यांना सुधारित निर्देश दिले आहेत. कोरोना प्रतिबंधक लसीविषयी कोणतीही अफवा पसरवल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्याची सूचना राज्यांना करण्यात आली आहे. सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून लसीविषयक अफवा व्हायरल केल्या जात असल्यामुळे केंद्रीय गृह मंत्रालयाने हे कडक पाऊल उचलले आहे. या निर्देशासाठी कोविड-19 नियंत्रक मंडळ तज्ञांचा सल्लाही घेण्यात आला आहे.
कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा पहिला टप्पा देशात 16 जानेवारीपासून सुरू झाला. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी आणि अग्रभागी कामगारांसह तीन कोटी लोकांना लस देण्यात येत आहे. सध्या देशभरात पहिल्या टप्प्यातील कोरोनाचे लसीकरण सुरू आहे. त्यानंतर पुढील टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह गृहमंत्री अमित शहा, अनेक राज्यांचे राज्यपाल आणि मंत्रिमंडळातील इतर सदस्य लस घेणार आहेत. तसेच 50 वर्षांवरील अन्य राजकीय नेत्यांना लस देण्यात येणार आहे. सरकारने कोरोना लसीकरणाची मोहीम टप्प्याटप्प्यांमध्ये राबवली जाणार असल्याचे आधीच स्पष्ट केले आहे.