मुंबई/प्रतिनिधी
राज्याती करोना संसर्ग दिवसेंदिवस अधिकच वाढताना दिसत आहे. राज्यात रूग्णसंख्येत दररोज मोठी वाढ सुरू आहे. दुसरीकडे केंद्र सरकारने १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांना लसीकरणाची घोषणा केली आहे. मात्र महाराष्ट्रात लसीकरणाचा तुटवडा अद्यापही कायम असल्याने, १ मे पासून लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू होणार नसल्याचे सांगण्यात आलं आहे. यावरून आता सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचं चित्र आहे. या पार्श्वभूमीवर आज(शुक्रवार) राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
“देशात कोरोनाशी लढण्यात मोदी सरकार अपयशी ठरलं आहे. केंद्र सरकारकडून कुठलेही नियोजन न करता घोषणा केल्या जातात. राज्यांना लस पुरवठा करण्यात केंद्र सरकार अपयशी ठरलं आहे. उद्यापासून राज्यात लसीकरणाची घोषणा केली आहे मात्र लसच उपलब्ध नाही, तर लसीकरण होणार कसं ? सरकारला उत्तर द्यावं लागेल.” असं नवाब मलिक म्हणाले आहेत.