‘मन की बात’ मध्ये पंतप्रधान मोदींचे आवाहन
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
‘माझ्या शंभर वर्षांच्या मातेनेही कोरोना लस घेतली आहे. या लसींसंबंधी पसरविल्या जाणाऱया अफवांवर विश्वास न ठेवता, प्रत्येकाने लस घ्यावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशाशी संवाद साधताना त्यांनी हे आवाहन केले. कोणताही किंतु न बाळगता लसीकरण करून घ्या. कोरोनाचा धोका टाळण्याचा हाच एक सर्वोत्तम उपाय आहे. कोरोनाचा धोका अद्याप संपलेला नाही. त्यामुळे लस घेण्यात नागरीकांनी कोणतीही हयगय करू नये, असे आग्रही प्रतिपादन त्यांनी केले.
मध्यप्रदेशातील बेतुल जिल्हय़ाच्या काही वनवासी नागरीकांशी त्यांनी संवाद साधला. दुलारिया गावातील नागरीकांनी त्यांना लसीसंबंधी उठविल्या जाणाऱया अफवा आणि पसरविले जाणारे गैसमज यांची माहिती दिली. लोकांनी असे प्रयत्न हाणून पाडावेत. अफवांवर विश्वास न ठेवता विज्ञान आणि वैज्ञानिक यांच्यावर विश्वास टाकावा, असे प्रतिपादनही त्यांनी स्पष्टपणे केले.
कोरोना संपलेला नाही
कोरोना नाहीसा झालेला आहे, असे कोणी म्हटले तर ते खरे मानू नका. कोरोनाचा धोका अद्यापही आहेच. त्यामुळे दक्षता बाळगणे आवश्यक आहे. कोरोना विषाणू हा अत्यंत फसवा आहे. तो नवनवी रुपे धारण करतो आणि तो संपला असे वाटतानाच त्याचा पुन्हा उद्रेक होतो. त्यामुळी दीर्घकाळपर्यंत आपल्याला आरोग्यनियमांचे पालन करावे लागणार आहे. वारंवार साबणाने हात स्वच्छ करणे, नाक व तोंड झाकणाऱया मास्कचा उपयोग करणे आणि सामाजिक अंतर राखणे हे उपाय तर आचरणात आणले पाहिजेतच, पण मुख्य उपाय लसीकरण हाच आहे. तो टाळू नका, असे कळकळीचे आवाहन त्यांनी नागरीकांना केले.
डॉक्टर, अधिकाऱयांची प्रशंसा
कोरोनाविरुद्धच्या संघर्षात देशभरातील डॉक्टर्स आणि आरोग्याधिकारी यांनी अत्यंत मोलाची आणि प्रशंसनीय कामगिरी अनेकदा स्वतःचा जीव धोक्यात घालून पार पाडली आहे. आजही हे योद्धे कार्यरत आहेत. केंद्र सरकारमधील गुरुप्रसाद मोहपात्रा या अधिकाऱयाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. ऑक्सिजन पुरवठय़ाची व्यवस्था करण्यासाठी ते स्वतःच्या प्रकृतीची तमा न बाळगता नेहमीच्या वेळेपेक्षा जास्त काळ काम करीत होते. त्या ताणामुळे त्यांना मृत्यूला सामोरे जावे लागले. तथापि त्यांनी काम थांबवले नाही. देश नेहमीच अशा अधिकाऱयांचा ऋणी राहील. त्यांनी अविस्मरणीय काम केले आहे, अशी भलावण त्यांनी केली.
मिल्खासिंगना श्रद्धांजली
आपल्या भाषणात त्यांनी भारताचे जुन्या काळातील धावपटू मिल्खासिंग यांच्या निधनावर दुःख व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली. भारताच्या क्रिडाक्षेत्रात सिंग यांचे योगदान प्रत्येकाच्या स्मरणात राहील. सिंग यांचे निधन कोरोनामुळेच झाले होते. त्याची पत्नी निर्मल कौर यांचाही याच कारणाने मृत्यू झाला होता.
इतर विषयांना स्पर्ष
मान्सूनने आता देशाचा बराचसा भाग व्यापला आहे. आपण जलसंधारणाच्या कामात स्वतःला झोकून दिले पाहिजे. पाण्याचा थेंब अन् थेंब वाचविला पाहिजे. उत्तराखंडातील पौडी गढवाल येथील एक प्राध्यापक सच्चिदानंद भारती यांनी या संबंधात केलेले कार्य उल्लेखनीय आहे, असे त्यांनी नमूद केले.
विक्रमी लसीकरण
21 जूनला एकाच दिवसात 86 लाख लोकांचे लसीकरण झाले. त्यामुळे तो दिवस ऐतिहासिक ठरला. आतापर्यंत 31 कोटींहून अधिकांचे लसीकरण झाले आहे. केंद्र सरकारने सर्व प्रौढ व्यक्तींना विनामूल्य लस देण्याची योजना बनविली आहे. या योजनेवर झपाटय़ाने काम होत आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
वेहानचे कौतुक
जम्मू-काश्मीरमधील बांदीपोरा जिल्हय़ातल्या वेहान या खेडय़ाचा उल्लेख पंतप्रधान मोदी यांनी आवर्जून केला. सर्व नागरीकांचे लसीकरण करणारे हे भारतातील प्रथम गाव ठरले. यासंदर्भात त्यांनी गावकरी व स्थानिक प्रशासनाचे अभिनंदन केले. त्यांनी या गावाचा उल्लेख केल्याने ते प्रकाशझोतात आले आहे. या गावाचा संदर्भ पंतप्रधान मोदींनी दिल्याने साऱया जिल्हय़ाचा सन्मान झाला आहे, अशी प्रतिक्रिया या जिल्हय़ाचे अधिकारी ओवैस अहमद यांनी व्यक्त केली.
काय म्हणाले पंतप्रधान मोदी…
ड लसीकरण हाच कोरोनावरील सर्वात प्रभावी उपाय
ड प्रत्येकाने लस घेण्याचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे
ड लसींसंबंधी कोणतीही भीती किंवा शंका नाकारावी ड कोरोना संपलेला नाही, दक्षता बाळगावी लागणारच