सावधगिरी आवश्यक : कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुनरुच्चार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी अत्यंत सावधगिरी बाळगण्याच्या आवाहनाचा पुनरुच्चार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी पुन्हा एकदा केला. कोरोना विषाणूवर प्रभावी औषध विकसित होईपर्यंत कोणीही निष्काळजीपणाने वागू नये, (‘जब तक दवाई नहीं, तब तक नहीं ढिलाई’) असे आवाहन पंतप्रधानांनी केले आहे. मध्यप्रदेशातील ग्रामीण भागात पंतप्रधान आवास योजनेंतर्गत तयार करण्यात आलेल्या 1 लाख 75 हजार घरांच्या उद्घाटन सोहळय़ाला संबोधित करताना त्यांनी हे आवाहन केले आहे.
भारत बायोटेक, सीरम इन्स्टिटय़ूट, झाइडस कॅडिला, पॅनासीआ बायोटेक, इंडियन इम्यूनोलॉजिकल, मायनव्हॅक्स आणि बायोलॉजिकल ई यासह किमान सात भारतीय औषध कंपन्या कोरोना विषाणूविरुद्ध लस विकसित करण्यासाठी कार्यरत आहेत. या सर्व कंपन्यांकडून केले जात असलेले प्रयत्न कौतुकास्पद असून त्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. लस तयार करण्यासाठी सरकारसह वैद्यकीय यंत्रणेकडून योग्य पद्धतीने संशोधन व विकसन सुरू आहे. मात्र, लोकांनीही सावधगिरीच्या सर्व उपाययोजना करून स्वतःची काळजी घेतली पाहिजे, असे मोदी म्हणाले.
मध्यप्रदेशात 1.75 लाख घरांचे उद्घाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मध्यप्रदेशात प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेंतर्गत तयार केलेल्या 1.75 लाख घरांचे उद्घाटन केले. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घर बांधण्यास सरासरी 125 दिवस लागत असत. परंतु कोरोनाच्या काळात या योजनेंतर्गत फक्त 45 ते 60 दिवसांत घरे बांधली गेली. आपत्तीला संधीमध्ये बदलण्यासाठी हे उत्तम उदाहरण आहे. कोरोना कालावधीत सर्व अडथळय़ांच्या दरम्यान देशभरात 18 लाख घरे पूर्ण झाली, अशी माहितीही पंतप्रधानांनी यावेळी दिली. या योजनेंतर्गत घरे मिळालेल्या तीन लाभार्थ्यांशीही त्यांनी चर्चा केली. यामध्ये धार जिह्यातील सरदारपूर गावचा गुलाबसिंग, सिंगरौली जिह्यातील प्यारेलाल यादव आणि ग्वाल्हेर जिह्यातील नरेंद्र नामदेव यांचा समावेश आहे.
कोवॅक्सिन माकडांवर प्रभावी भारत बायोटेकला मोठे यश
भारत बायोटेक या कंपनीची पहिल्या टप्प्यातील कोरोना चाचणी यशस्वीपणे पार पडली आहे. आनंदाची गोष्ट म्हणजे कोवॅक्सिनची माकडांवर करण्यात आलेली चाचणी यशस्वी झाली आहे. भारत बायोटेक कंपनीने यासंदर्भात घोषणा केली आहे. ही लस लाईव्ह व्हायरल चॅलेंज मॉडेलमध्ये माकडांवर केलेल्या प्रयोगात सुरक्षित असल्याचे दिसून आले आहे. भारत बायोटेक कंपनीने दिलेल्या माहितीनुसार माकडांवर केलेल्या लसीच्या प्रयोगानंतर त्यांच्यातील रोगप्रतिकारक शक्ती दिसून आली आहे. भारत बायोटेकने ही चाचणी मकाका मुलाटा जातीच्या विशिष्ट प्रकारच्या माकडांवर केली आहे. पहिली चाचणी यशस्वी पार पडल्यानंतर दुसऱया चाचणीसाठी भारत बायोटेक कंपनीने ‘डीजीसीआय’कडे परवानगी मागितली आहे. येत्या काही दिवसांत चाचणीचा दुसरा टप्पा सुरु करण्यात येईल अशी माहिती देण्यात आली आहे. भारत बायोटेक कंपनीने 12 शहरांमध्ये कोरोना लसीची चाचणी केली आहे. भारतात आतापर्यंत तीन लसींवर सध्या काम सुरू आहे. सीरम इन्स्टिटय़ूट आणि ऑक्सफर्ड यांच्या भागिदारीतून तयार करण्यात येणाऱया लसीची मानवी चाचणी देखील भारतात सुरू आहे.