लांजातील संजय खानविलकर यांचा आंबा उत्पादक शेतकऱयांना आशेचा किरण
प्रतिनिधी / लांजा
कोरोना लॉकडाऊनमुळे चिंताग्रस्त असलेल्या आंबा उत्पादक शेतकऱयांना आशेचा किरण लांजातील आंबा उत्पादक संजय खानविलकर यांनी सिद्धी विनायक नावाने ब्रॅण्डिंग करून हापूस महाराष्ट्रभर पोहोचवून दिला आहे. त्यांनी सुमारे 22 लाख रूपयांची उलाढाल लॉकडाऊन काळात केली आहे. लांजा, राजापूर आणि रत्नागिरी तालुक्यातील आंबा शेतकऱयांना याचा फायदा झाला आहे.
कोकणची मुख्य अर्थव्यवस्था असलेल्या हापूस आंब्याची दरवर्षी सुमारे 3 हजार कोटी रुपयांची उलाढाल होत असते. जीआय मानांकन असलेल्या या आंब्याच्या अर्थव्यवस्थेवर काही शेतकरी आणि त्यावर अवलंबून असणाऱया मजूर यांचा उदरनिर्वाह आहे. कोरोनाच्या महामारीने हापूस आंबा मंदीच्या कचाटय़ात सापडला. सर्व शेतकरी हवालदिल असताना आणि हाता-तोंडाशी आलेला आंबा पडून राहू नये, यासाठी लांजा तालुक्यातील खानवली गावचे आंबा उत्पादक संजय प्रतापराव खानविलकर या शेतकऱयाने पुढाकार घेतला. तीनही तालुक्यातील शेतकऱयांशी सर्पक साधून आंबा गोळा केला. आंबा सिद्धि विनायक रत्नागिरी हापूस नावाने ब्रॅण्डिंग केला. या कामी लांजातील वकील अभिजित जेधे यांनी सहकार्य केले. पुणे, मुबंई, नाशिक, जालना, अहमदनगर जिह्यात ऑर्डर दिल्या. संचारबंदीमुळे आवश्यक परवानगी देण्यात लांजा पोलीस निरीक्षक संजय चौधर आणि तालुका कृषी अधिकारी यांनी सहकार्य केले. स्वरूपानंद प्रिंटिंग प्रेसचे पत्की यांनी खोका पेटी तयार करून दिली. विपणन आणि वाहतूक व्यवस्था यांचे नियोजन करुन खानविलकर यांच्या या अभिनव प्रयोगाने येथील शेतकरी समाधानी झाले आहेत
या बाबत बोलताना संजय खानविलकर यांनी एकमेका सहाय्य करू.. अवघे धरू सुपंथ.. या संत तुकाराम महाराजांच्या लिहिलेल्या वाक्याची आज चांगलीच प्रचिती आपल्याला आली. अभिजित जेधे यांचे त्यांनी आभार मानले. गेली जवळजवळ 2 महिने कोविड-19 या रोगाने अख्ख्या जगावर विळखा घातला असताना त्याचा फटका सर्वसाधारण लोकांना सहन करावा लागत आहे. त्यामध्ये ही वेळ म्हणजे कोकणातील शेतकऱयांच्या वर्षभराच्या कष्टाचे फळ मिळण्याची, परंतु या रोगाने सर्वांची निराशा केली. आता अस वाटल होतं की यावर्षी आंब्याचा काहीच व्यापार होणार नाही. कारण या महारोगाने सर्वजण घाबरले होते. त्यामुळे सर्वच आंब्याची ऑर्डर द्यायला घाबरत होते. अभिजित जेधे यांनी जालना, अहमदनगर, नाशिक, पुणे, मुंबई येथून खूप ऑर्डर मिळून दिल्या. काहीच ऑर्डर नव्हत्या म्हणून खूप हताश झालो होतो, पण जेधे यांनी मदतकार्य केले. यामुळे तोटय़ात नाही गेलो किंवा जास्त नफ्यातही नाही. मात्र आंब्याचा व्यवसाय तिथपर्यंत पोहोचला, हे महत्वाचे आहे. यावर्षी जास्त नाही नफा झाला, पण यापुढे नक्की होईल, असा विश्वास व्यक्त केला.