पंजाबमधील महत्त्वाचे शहर जालंधर येथील काष्ठ कलाकार (वूड आर्टिस्ट) सुप्रिया शर्मा त्यांच्या नाविन्यपूर्ण कलाकृतींमुळे चर्चेत आहेत. निर्जिव आणि शुष्क लाकडांपासून सजीव कलाकृती बनविण्यात त्यांचा हातखंडा आहे. त्यामुळे त्या पंचक्रोशीत लाकडात जीव ओतणाऱया कलाकार म्हणून प्रसिद्ध आहेत. लाकडांप्रमाणेच वाळलेली पाने आणि सुकलेली फुले यांच्याही सजीव कलाकृती बनविण्याचे कौशल्य त्यांनी आत्मसात केले आहे. सर्वसाधारणपणे अशा वस्तू जाळून नष्ट करण्याकडे सर्वसामान्य माणसाचा कल असतो. तथापि, या टाकाऊ वस्तूंमध्येही त्यांनी आपल्या कौशल्याने जिवंतपणा निर्माण करण्याचा छंद जोपासला आहे.
त्यांना ही आवड खूप लहानपणापासून आहे, असे त्यांचे माता-पिता सांगतात. निर्माल्यापासून नव्या वस्तू बनविण्याचा छंद तेव्हापासूनचा आहे. याच वस्तूंपासून त्या घराचे डिझायनिंग करीत असत. त्यांच्या या कलेचे कौतुक त्यांच्या बालपणापासूनच होत आहे. आता विवाह झाल्यानंतरही त्यांनी ही कला जोपासली आहे. त्यांचे पती राजीव शर्मा आणि त्यांचा पूर्ण परिवार त्यांना याकामी सहयोग करून प्रोत्साहन देत असतो. अलीकडच्या काळात त्यांनी आपल्या या कलेला आपल्या संगणक ज्ञानाची जोड दिली आहे. त्या स्वतः कॉम्प्युटर ऍप्लिकेशन या विषयात पदवीधारक आहेत. आपले पिता शामलाल यांच्याकडून प्रेरणा घेऊन त्यांनी ही कला जोपासली आहे. त्यांनी याचे विशेष प्रशिक्षण घेतलेले नसले तरी स्वतःच प्रयोग करून आणि स्वतःची कल्पनाशक्ती लढवून त्यांनी प्रगती साधली असून आता एक मोठा स्टुडिओही स्थापन केला आहे. उत्तर भारतातील बहुतेक मोठय़ा शहरांमध्ये त्यांच्या वस्तूंची प्रदर्शने भरलेली आहेत. तसेच त्यांना उत्कृष्ट व्यवसायही मिळालेला आहे. त्यांची कला पर्यावरणपूरक असल्याने पर्यावरण सुरक्षेच्या संदर्भात संवेदनशील असणाऱया व्यक्तींकडून त्यांचे विशेष कौतुक होत आहे. कोणतीही वस्तू टाकाऊ नसते, हे आपले सर्वात महत्त्वाचे जीवनविषयक तत्त्व आहे, असे त्या म्हणतात.