शेतकर्याबरोबर वडूज शहरातील नागरीकांचीही कुचंबना
प्रतिनिधी/ वडूज
लॉकडाऊनच्या काळात वेगवेगळ्या प्रकारचे शासकीय, निमशासकीय व खासगी अस्थापनातील शेकडो नागरीक सकाळी अत्यावश्यक सेवेसाठी खुल्या ठेवलेल्या आठ ते बारा या वेळेत ओळखपत्र खिशात ठेवून राजरोसपणे फिरत आहेत. मात्र शेतीमाल विकणे व खते-बियाणे खरेदीसाठी येणार्या शेतकर्यांची शहराच्या शिवेवरच अडवणूक होत आहे. तर रेशनिंग व इतर आवश्यक कामासाठी उपनगरातून मुख्य शहरात येणार्या नागरीकांची पोलीसांकडून हेळसांड होत आहे. त्यामुळे लाखोंचा पोशिंदा असणार्या बळीराजाला कोण ओळख देणार आहे का ? असा संतप्त सवाल शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.
कोरोना संसर्गाचा खटाव तालुक्यात कोणत्याही परस्थितीत शिरकाव होवू द्यायचा नाही या जिद्दीने प्रशासन पेटले आहे. त्यामुळे पोलीस व महसूल यंत्रणेकडून सर्व प्रकारची काटेकोर उपाय योजना होत आहे. मात्र अति शिस्तीच्या नावाखाली सर्वसामान्य नागरीकांची जास्त मुस्कटदाबी होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. दोन दिवसांपूर्वी गणेशवाडी फाटय़ावरील पोलीस व इतर कर्मचार्यांनी वडूज येथे खते-औषधे आणण्यासाठी येत असलेल्या माजी उपसभापती नाना पुजारी व इतर काही नागरीकांची अडवणूक केल्याचा प्रकार सोशल मिडीयावरुन मोठय़ा प्रमाणात व्हायरल झाला होता. तर बाजारपेठ नसल्याने अनेक शेतकर्यांच्या शेतातील कलिंगडे, टरबुज, पुंडय़ा ऊस व इतर भाजीपाल्याच्या पिकांची नासाडी झाली आहे. तेलबिया, घाण्यावर घेवून जातानाही पोलीसांकडून अडवणूक होत आहे. तर शेतकर्याचा माल शहरात पोहोचत नसल्याने घेवारे व व्यापारी वर्गाचे चांगलेच फावत आहे. शेतकर्याकडून व्यापारी कमी दरात माल घेवून ग्राहकांना चढय़ा दराने भाजीपाला विकत आहेत. अश्या कठीण परस्थितीत शेतकर्यासाठी कृषी विभागाने ठोस उपाय योजना करण्याची गरज आहे. मात्र कृषी विभाग रब्बी हंगामात पिकवलेला शेतकरी माल व बाजार पेठेकडे दुर्लक्ष करुन आगामी खरीब हंगामातील बियाणे, खतांच्या मागणीसंदर्भात ऑनलाईन अर्ज करण्याचे आव्हान करुन ऊंटावरुन शेळ्या राखत असल्याचा सुर शेतकरी वर्गातून येत आहे.
पोलीसांनी पुसेगांव रस्त्यावर शिवाजी हायस्कूल नजीक तर दहिवडी रस्त्यावर हुतात्मा हायस्कूल नजीक बॅरिगेट लावले आहेत. त्यामुळे शिक्षक कॉलनी, भाग्योदय नगर, कर्मवीर नगर, विठ्ठल नगर, माधव नगर (काळे वस्ती), मार्केट कमिटी नजीकचा रहिवाशी वर्गाला येता, जाताना पोलीसांकडून त्रास होत असल्याची चर्चा आहे. यामध्ये रेशनिंग ग्राहकासह अत्यावश्यक सेवेसाठी शहरात येणारे शिक्षक व इतर कर्मचारीही भरडले गेल्याची चर्चा आहे. कुरोली फाटय़ावर पोलीसांच्या मदतीला काही स्वयंसेवक आहेत. हे स्वयंसेवक वाहतुकीला शिस्त लावण्याऐवजी टोलबुथवरच्या कर्मचार्याच्या अविर्भावात वावरत असल्याची चर्चा आहे.