प्रतिनिधी/ रायगड
मागील दोन वर्ष कोरोना महामारीमुळे रायगडावर साध्या पद्धतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा झाला होता. कोरोनाचे संकट संपल्यानंतर किल्ले रायगडावर सोमवारी 348 वा शिवराYYYYज्याभिषेक दिन उत्साहात साजरा झाला. या सोहळ्याची याची देही याची डोळा अनुभूती घेण्यासाठी लाखो शिवभक्तांनी किल्ले रायगड हजेरी लावली होती. दोन वर्षांनंतर शिवभक्तांच्या अलोट गर्दीत शिवगर्जनेने अवघा रायगड दुमदुमून गेला.
आखिल भारतीय शिवराज्याभिषेक सोहळा समितीमार्फत गेली अनेक वर्ष किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन केले जात आहे. मात्र यावर्षी किल्ले रायगडावर तुफान गर्दी लोटली होती. किल्ले रायगडचा पायरी मार्ग, रज्जूमार्ग शिवभक्तांच्या गर्दीने फुलून गेले होते. सर्वत्र भगव्या पताका, फेटे बांधलेले शिवभक्त दिसून येत होते. या शिवराज्याभिषेक सोहळ्याला पहाटेच सुरुवात झाली. ढोल ताशे, हलगीवर खेळले जाणारे मर्दानी खेळ, गोंधळ, शाहिरी पोवाडय़ांनी संपूर्ण आसमंत निनादून गेला.
छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी वाजत गाजत राजसदर येथे आणण्यात आली. राजसदरेवर छत्रपती युवराज संभाजी राजे आणि त्यांचे पुत्र शहाजी राजे यांच्याहस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पंच जलकुंभातील पाणी आणि दुग्धाभिषेक करण्यात आला. छत्रपती संभाजीराजे यांच्याहस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण व सुवर्ण नाण्यांचा अभिषेक करण्यात आला यावेळी उपस्थित शिवभक्तांनी शिवरायांचा जोरदार जयघोष केला.
यावेळी आमदार मंगेश चव्हाण, आमदार अनिकेत तटकरे, आमदार राजू पाटील, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक करणभाऊ गायकर, राजीव भोर पाटील, विनोद साबळे, अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत आदी उपस्थित होते.
प्रशासनाकडून चोख बंदोबस्त व अन्य व्यवस्था करण्यात आली होती, गडावर जाणारी पायवाट सुरक्षित करण्यात आली होती. गर्दी होणार नाही याचीही खबरदारी घेण्यात आली होती. शिवभक्तांची मोठय़ा प्रमाणात उपस्थिती असूनही गडावरील सोहळा शांततेत आणि उत्साही वातावरणात पार पडला.
सन्मान नाही त्या ठिकाणी थांबणे नाही ः छत्रपती संभाजीराजे
आपल्या भाषणात छत्रपती युवराज संभाजी राजे यांनी ज्या मातीला छत्रपती शिवाजी महाराजांचे पदस्पर्श झाला आहे त्या भूमीत त्यांचा वंशज म्हणून काम करताना अभिमान वाटतो. आज आपण जे आहोत ते केवळ या छत्रपती शिवराय आणि रायगडामुळे आहोत, असे स्पष्ट करत रायगड संवर्धन ही काळाची गरज असल्याचे स्पष्ट केले. यावेळी युवराज संभाजी राजे यांनी सन्मानाने राहण्याची शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली आहे यामुळे जेथे सन्मान नाही त्या ठिकाणी थांबणे नाही असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी राजकीय पक्षांना लगावला.