प्रतिनिधी/ सातारा
सातारा नगरपालिकेत उपमुख्याधिकारी संचित धुमाळ यांना लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. पालिकेतील लाचखोरीची बाब निश्चित निषेधार्ह असून याप्रकरणी पालिकेतील सर्वजण सारखेच समजणे चुकीचे ठरेल. नगरपालिका संचलनालयाकडून थेट नियुक्त झालेल्या संचित धुमाळवर कायद्यानुसार कठोर कारवाई झाली पाहिजे, असे मत नगराध्यक्षा माधवी कदम यांनी व्यक्त केले.
सातारा पालिकेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत खुद्द उपमुख्याधिकारीच लाच घेताना सापळय़ात अडकला. या प्रकरणानंतर नगराध्यक्षा माधवी कदम यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करण्यासाठी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सातारा विकास आघाडीच्या सत्तेच्या काळात खासदार उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली गेल्या आठ ते दहा वर्षात ग्रेडसेपरेटर, कास धरणाची उंची, नवीन कास पाईप लाईन, भुयारी गटर योजना, घरकूल योजना, घनकचरा व्यवस्थापन, आयडीएसएमटी, युआयडीएसएसएमटी असे कोटय़वधी रुपयांचे प्रकल्प सातारकरांच्या हितासाठी राबवण्यात आले आहेत.
शहरातील गल्लीबोळात विद्युतीकरण, काँक्रीट रोड, गटर्स, रस्ते याबरोबरच दैनंदिन विकासकामे गरजेनुसार प्राधान्याने करण्यात येत आहेत. पण नगरपरिषद संचालनालयाकडून थेट नियुक्ती झालेल्या अधिकाऱयांना त्यांचे गाव सोडून नियुक्त्या मिळाल्याने त्यांना सामाजिक बांधिलकी व शहराविषयी आत्मियता कमी असते. त्यामुळेच संचित धुमाळांसारखा एखादा अधिकारी मनाची व जनाची लाज सोडून वागल्यावर असे परिणाम दिसू शकतात. जे कोणी दोषी असतील त्यांना शिक्षा झालीच पाहिजे मात्र कोणाही निष्पाप व्यक्तीवर अन्याय होणार याचीही खबरदारी घेतली गेली पाहिजे.
काहीजण या प्रकाराचे भांडवल करुन नगरपालिकेवर कोणाचा वचक राहिला नाही अशी टीकाटिपण्णी करुन संधीचा लाभ उठवण्याच्या हेतूने करत असले तरी जनता सर्व पहात असते. उगाच पराचा कावळा करु नका. ज्यांनी अपराध केला आहे त्यांना कायदा शासन करेलच. जे काही घडले ते अक्षम्य असल्याचे कदम यांनी शेवटी स्पष्ट केले आहे.