प्रतिनिधी/रत्नागिरी
भ्रष्टाचारावर नियंत्रण आणण्यासाठी रत्नागिरी जिल्हा लाचलुचपत प्रतिबंधक खात्यामार्फत नवी संकल्पना राबवली जात आहे. त्यानुसार आता तक्रार दाखल करण्यासाठी लाचलुचपत कार्यालयात येण्याची गरज लागणार नाही. तक्रारदार आपल्या घरातून भ्रष्टाचारासंबंधीची तक्रार थेट लाचलुचपत कार्यालयाकडे करू शकतो, अशी माहिती रत्नागिरी येथे नव्याने कार्यसूत्रे हाती घेतलेले उपाधीक्षक सुशांत चव्हाण यांनी दिली. तक्रार प्राप्त होताच तक्रारदाराच्या घरापर्यंत जाऊन रितसर तक्रार घेऊन कारवाई केली जाणार आहे.
रत्नागिरी जिल्हा ‘लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय आपल्या दारी’ ही संकल्पना राबवणार आहे. उपाधीक्षक सुशांत चव्हाण हे यापूर्वी पोलीस उपनिरीक्षक म्हणून रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात कार्यरत होते. त्यानंतर त्यांची अन्यत्र बदली झाली होती. आता बढतीने पुन्हा ते रत्नागिरीत लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात उपाधीक्षकपदी नुकतेच रूज झाले आहेत. केवळ कामासाठी पैसे मागणे इतक्या पुरताच लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचा कारभार मर्यादित नाही. तर कोणत्याही शासकीय योजनेमध्ये भ्रष्टाचार असेल किंवा कोणीही अधिकची संपत्ती जमा केली असेल तर त्याच्याविरुद्धसुद्धा कारवाई करता येते. समाजाचे काम योग्य पद्धतीने चालावे यासाठी भ्रष्टाचाराच्या प्रकारांना पायबंद घालणे आवश्यक असल्याचे चव्हाण म्हणाले.
अनेकदा काही अडचणींमुळे किंवा गैरसमजुतीमुळे नागरिक तक्रार द्यायला पुढे येत नाहीत. त्यामुळे भ्रष्टाचारांच्या प्रकारांना खतपाणीच मिळत असते. भ्रष्टाचाराची प्रकरणे समाजासमोर यावीत, त्यातून पिळवणूक होणाऱया जनतेची सुटका व्हावी, चांगल्या कामात पारदर्शकता यावी हा या संकल्पनेमागचा हेतू आहे. रत्नागिरी जिह्याची भौगोलिक स्थिती अडचणीची आहे. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे कार्यालय लांब असल्यानेही अनेकदा तक्रारदाराला इथे येणे अडचणीचे होते. ही परिस्थिती लक्षात घेऊन आता ‘लाचलुचपत प्रतिबंधक खाते आपल्या दारी’ ही संकल्पना राबवण्यात येणार आहे.