प्रतिनिधी/ सातारा
आधीच सुलतानी कोरोनाचे संकट. त्यात वरुन अतिवृष्टीचे अस्मानी संकट कोसळल्याने यावर्षी सण, उत्सव अतिशय साधेपणाने साजरे करण्याचे प्रशासनाकडूनच सक्ती केली गेली आहे. गेली दहा दिवस गणपती बाप्पा मुक्कामी होते. दहा दिवसांच्या मुक्कामानंतर अनंत चतुर्थीच्या दिवशी जिह्यातील साडेतीन हजार गणेशोत्सव मंडळांनी आपल्या लाडक्या बाप्यांना भावपूर्ण निरोप दिला. जिह्यात कोणताही अनुचित प्रकार विसर्जन मिरवणूकीदरम्यान घडला नाही. सातारचे पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी सर्वच ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवल्याने गणेश विसर्जन प्रक्रिया शांततेत पार पडली. दरम्यान, सातारा शहरात मंडईच्या राजा या मंडळाने गुलाल उधळण केल्याप्रकरणी त्यांच्यावर मंडलाधिकाऱयांनी शाहुपूरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. राज्याचे गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी कराडच्या कृष्णामाई घाटावर आरती केली.
यावर्षी गतवर्षीप्रमाणे कोरोनाची लाट असल्याने कुठलाही डामडोल न करता जिह्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी अतिशय साध्या पद्धतीने कमी उंचीच्या गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करत कोणताही देखावा न करता मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती. कोरोनाचे संकट असताना जिह्यातील गणेश भक्तांना यावर्षीचा उत्सव हा अतिशय साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आदेश दिले गेले होते. त्यानुसार जिह्यातील सुमारे साडेतीन हजार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी कोणताही देखावा केला नव्हता वा कसलेही कार्यक्रम घेतले नव्हते. आपल्या लाडक्या बाप्पांची सेवा दहा दिवस गणेश भक्तांनी केली होती. या दहा दिवसांमध्ये गणेशोत्सव मंडळांनी पुरग्रस्तांना मदत, कोरोनाचा प्रार्दुभाव टाळण्यासाठी लसीकरण मोहिमेचा प्रचार आदी कार्यक्रम मोठया प्रमाणावर राबवण्यात आले. दहाव्या दिवशी सातारा जिह्यात मुख्य विसर्जन असल्याने ती प्रक्रिया शांततेत पार पाडावी याकरता जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी सर्वच पोलीस ठाण्यांच्या कर्मचाऱयांना आदेश दिले होते. त्यामुळे पोलीस कर्मचारी डोळयात तेल घालून पहारा देत होते. कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.
साताऱयाच्या मंडईच्या राजाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल
नियमांचा भंग करत मिरवणूक काढून गुलालाची उधळण केल्याप्रकरणी साताऱयाच्या मंडईच्या राजा या मंडळाच्या कार्यकर्त्यांवर शाहुपूरी पोलीस ठाण्यात मंडलाधिकारी जाधव यांनी गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झालेल्यामंध्ये महेश किरण पागडे (वय 37), अमोल गजानन हादगे(वय 22, रा. सदाशिव पेठ), शंभूराज चंद्रकांत साळुंखे(वय 36, रा. सदाशिव पेठ, सातारा), किरण प्रकाश साळुंखे(वय 37), ईश्वर श्रीरंग साळुंखे (वय 37, रा. निसर्ग कॉलनी), पुरव दिलीप शहा(वय 38, रा. सदाशिव पेठ), महेश चंद्रकांत साळुंखे (वय 38, रा. सदाशिव पेठ, सातारा), पराग गणेश निवळे(वय 30, रा. ढोणेकॉलनी), सनी सुर्यकांत साळुंखे(वय 24, रा. गजानन महाराज मठ), योगेश सपकाळ यांच्यासह दहा ते बारा जणांनी परवानगीशिवाय मिरवणूक काढून गुलालाची उधळण केली. त्यावरुन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गृहराज्यमंत्र्यांनी केली आरती
राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई हे गणेशभक्त आहेत. ते दररोज दिवसाची सुरुवात पंचमुखी गणपती आणि गारेचा गणपतीच्या दर्शनाने करतात. विसर्जनाच्या दिवशीही त्यांनी साताऱयाची पाहणी करुन कराड येथील कृष्णामाई घाटावर हजेरी लावली. तेथे त्यांनी विसर्जनाच्यावेळी आरती केली. त्यामुळे उपस्थित पोलिसांना आणि गणेशक्तांमध्येही चैतन्य आले.