जीवावर उदार होऊन दोघा भावंडांना बुडताना वाचविले : रेहानच्या प्रकृतीत सुधारणा
प्रतिनिधी /वाळपई
नाणूस बेतकेकरवाडा येथील नदीवर तीन भावंडे बुडण्याची मंगळवारी घटना घडली. यामध्ये एकाचा बडून मृत्यू होण्याचा दुर्दैवी प्रकार घडला. येथील लाड कुटुंबीयांच्या प्रयत्नामुळे अन्य दोघांना वाचविण्यात यश मिळाले. याबाबत लाड कुटुंबियांचे सर्व थरावरून कौतुक करण्यात येत आहे.
सदर सागर व साहिल यांनी धाडस करून नदीच्या प्रवाहात झोकून दिले व तिघांपैकी दोघांना वाचविण्यात यश आले. अन्यथा संबंधित शेख कुटुंबावर आणखी मोठा आघात झाला असता.
नाणूस बेतकेकरवाडा येथे नदीवर आंघोळ करण्यासाठी शेख कुटुंबातील इरफान(15), आसिफ(13), रेहान(10) तीन भावंडे गेली होती. यावेळी ही तिन्ही भावंडे नदीत उतरली असता पाण्याच्या प्रवाहात गटांगळय़ा खात बुडत असल्याचे नदीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या रंजना नामक महिला व त्यांच्या मुलीने पाहिले. त्यांनी याबाबत साहिल व सागर यांना घटनेची माहिती दिली. आल्यानंतर त्यांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी येऊन जीवाची पर्वा न करता नदीमध्ये उडी घेतली व त्यापैकी दोघा भावांना नदीपात्राबाहेर काढून वाचविले. मात्र तिसरा नदीच्या प्रवाहात वाहून दूर गेल्यामुळे वाचू शकला नाही.
चिंताजनक स्थितीत गोमेकॉत इस्तितळात दाखल करण्यात आलेल्या रेहान शेख याच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱयांनी स्पष्ट केले आहे. त्याच्या पोटात क्षमतेपेक्षा जास्त पाणी गेल्यामुळे त्याची प्रकृती चिंताजनक बनली होती. गोमेकॉत ताबडतोब त्याच्यावर उपचार सुरू केल्यामुळे त्याच्या प्रकृतीत बरीच सुधारणा होत असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.
दरम्यान, उत्तरीय तपासणी पूर्ण केल्यानंतर इरफान याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्याच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले.
लाड कुटुंबियांनी नदीच्या प्रवाहात बुडताना दोघांचे प्राण वाचविले. हे धाडस खरोखरच कौतुकास्पद आहे. यामुळे त्यांचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच आहे. कारण दुसऱयाचा जीव वाचविण्यासाठी आपला जीव धोक्यात घालण्यासाठी फारमोठे धाडस लागते. समाजामध्ये अशा प्रकारची माणुसकी दाखवणे ही खरोखरच अभिमानाची बाब आहे.
सेहझीन शेख वाळपई नगराध्यक्ष.
लाड कुटुंबियांनी दाखविलेले धाडस खरोखरच अभिनंदनीय आहे. कठीण काळात व पाण्याचा प्रवाहाला जोर असतानाही जीवाची पर्वा न करता दुसऱयाचा जीव वाचवण्यासाठी त्यांनी केलेली धडपड ही खरोखरच दखल घेण्यासारखी आहे. एक आदर्शवत कार्य आहे.
शेख फैझल, नगरसेवक.
नाणूस येथे घडलेली घटना खरोखरच दुर्दैवी आहे. मात्र सदर शेख कुटुंबातील दोन भावंडांना वाचविण्यात लाड कुटुंबाने दिलेले योगदान खरोखरच अभिमानास्पद आहे. साहिल या अवघ्या वर्षाच्या मुलाने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नदीमध्ये स्वतःला झोकून देत शेख कुटुंबातील मुलांना वाचविण्यासाठी केलेली धडपड ही खरोखरच समाजसाठी सदैव प्रेरणा देणारी ठरणार.
रामदास शिरोडकर, नगरसेवक तथा माजी नगराध्यक्ष.