ऑनलाईन टीम / लातूर :
लातूरमध्ये मागील 10 दिवसात कोरोना रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ झाली आहे. त्यामुळे लातूर जिल्ह्यात पुन्हा एकदा 15 ते 30 जुलै दरम्यान लॉक डाऊनची घोषणा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी केली आहे.
जिल्ह्यात सध्या 750 पेक्षा अधिक कोरोना रुग्ण आहेत. तर आतापर्यंत 34 जणांचा मृत्यू झाला आहे. ही वाढती संख्या लक्षात घेत पुन्हा एकदा लॉक डाऊन ची कडक अंबलबजावणी केली जाणार आहे. या लॉक डाऊन मध्ये किराणा दुकाने, भाजीपाला मार्केट देखील बंद ठेवले जाणार आहे.
या लॉक डाऊनसाठी काही मार्गदर्शक तत्वे व नवे नियम तयार करण्यात आले आहेत. या नव्या नियमानुसार आता 15 ते 30 जुलै पर्यंत जिल्ह्यात संचारबंदी लागू केली आहे. जिल्ह्यातील सर्व दुकाने, किरकोळ विक्री 15 ते 20 जुलै पर्यंत बंद राहील. 21 ते 30 जुलै पर्यंत होम डिलिव्हरी करण्यास सूट दिली आहे. यावर देखील बंधन असून दुपारी 12 पर्यंतच होम डिलिव्हरी करता येईल.
झोमॅटो, स्विगी आणि हॉटेल मधील खाद्य पदार्थ घरपोच देणारा सेवा 15 ते 30 जुलै दरम्यान बंदच राहतील. तसेच सार्वजनिक ठिकाणे, उद्याने, सलून, ब्युटी पार्लर बंद राहतील.
सार्वजनिक आणि खाजगी वाहनांवर बंदी असेल, मात्र केवळ अत्यावश्यक सेवेतील वाहनांना सूट असेल. सर्व प्रकारची बांधकामे बंद असतील. वर्तमानपत्र छपाईस परवानगी असेल मात्र, वितरण सकाळी सहा ते नऊ या वेळेतच करावे लागेल.
या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असे लातूर जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.